Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Tuesday, September 11, 2012

डेंग्यू आजारापासून बचाव कसा करावा?


 
मराठवाड्यात गेल्या काही वर्षांपासून डासांनी व पिसवांनी होणा-या आजारांनी साथीचे स्वरूप घेतले आहे. पाऊस पडला की, उघडी गटारे, साचलेले पाणी, उकीरडे यामुळे डासांची वाढ मोठ्या प्रमाणात होते. मग डासांमुळे होणारा संसर्ग म्हणजे ‘डेंग्यू’, मलेरिया, चिकुनगुन्या समाजात साथीचे रूप धारण करतात. डेंग्यू आजार पांढ-या व दिवसा चावणा-या तसेच साठवलेल्या पाण्यातून वाढलेल्या डासांमुळे होतो.

डेंग्यू आजार ठरावीक वेळापत्रकाप्रमाणे वागतो. त्यामुळे या आजाराची लक्षणे जरी विविध असली तरी, त्याच्या वेळापत्रकाप्रमाणे आपण त्यातील गंभीरता जाणून घेऊ शकतो. प्रथम लक्षणापासून ते बरे वाटेपर्यंतचा कालावधी साधारण 10 दिवसांपेक्षा जास्त नसतो.

लक्षणे : सुरुवातीला ताप येणे, अंग भरून येणे, हा ताप उतरण्यासाठी दर चार तासांनी औषधी घ्यावी लागतात. तरीही तो पूर्णपणे नॉर्मल होत नाही. याचे वैशिष्ट्य म्हणजे तो चार-पाच दिवस सारखा वारंवार येतो. रुग्ण या आजाराने खूप गळालेला असतो. हा ताप 5 किंवा 6 दिवसांनी कमी होतो. ताप कमी झालेला असला तरी रुग्ण खूप गळालेला किंवा थकलेला वाटतो.

याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जोपर्यंत रुग्णांच्या अंगात ताप असतो तोपर्यंत तो गंभीरच नसतो. रक्तातील प्लेटलेट्स या एक लाखांपेक्षा जास्त असतात. ब-याच जणांना ताप उतरल्यानंतर वैद्यकीय सल्ल्याची गरज वाटत नाही, पण डेंग्यू ताप उतरल्यानंतर रु ग्ण गंभीर होण्याची शक्यता जास्त असते. डेंग्यूत होणारे दुष्परिणाम 6 ते 9 दिवसांपर्यंत असतात.

- डोकेदुखी, अंग दुखणे डोळ्यापाठीमागे प्रचंड वेदना होणे.
- भूक मंदावणे, चक्कर येणे, थंड घाम सुटणे, उलटी होणे.
- अंगावर गोवरासारखे पुरळ येतात.
- डोळे लाल होणे, डोळे आल्यासारखा भास होणे, पण डोळ्यातील घाण येत नाही.

प्लेटलेट्सचे प्रमाण कमी झाल्याचे आपण ऐकतो. अगदी खेड्यातून रुग्ण पेशी कमी झाल्या म्हणून दवाखान्यात येतो, पण महत्त्वाचे म्हणजे प्लेटलेट्स देण्याची गरज नसते. जर रुग्णास रक्तस्राव होत असेल तरच प्लेटलेट्स द्यावयास पाहिजे. रक्तस्राव नसताना जर रक्ताचे घटक रुग्णास दिले तर त्याची प्रकृती सुधारण्याऐवजी बिघडण्याची शक्यता जास्त असते.

ताप उतरल्यानंतर अजून एक लक्षण जे थोडे अवघड असते. ते म्हणजे फ्ल्यूड शिफ्ट आपल्या शरीरातील पाणी व क्षार हे पोटात, छातीत जमा व्हायला लागते. हा काळ तापानंतर एक किंवा दोन दिवस असतो. रुग्णाला पोट दुखणे, उलटी होणे, दम लागणे अशी लक्षणे दिसतात. अशावेळी तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहणे योग्य.

6 ते 7 दिवसानंतर तळहात-तळपाय यांना खाज सुटते. ती एक दिवस टिकते. नंतर आपोआप कमी होते.

निदान : वरील लक्षणावरून डेंग्यूचे निदान करणे फारसे अवघड नाही. सुरुवातीच्या 3 दिवसांत जर निदान करायचे असेल तर एनएसआय नावाची एक रक्त तपासणी करावी लागते, पण ती अजून सगळीकडे उपलब्ध नाही. म्हणून त्याला 5 ते 6 दिवस डेंग्यूसदृश आजार म्हणावे. सातव्या दिवशी डेंग्यू कॅट, IgM, IgG Elisa Test करणे आवश्यक असते.

उपचार
- डासांचे निर्मूलन करणे हा कार्यक्रम प्रभावीपणे राबवला गेला पाहिजे. वैयक्तिक प्रतिबंध, परिसर स्वच्छ ठेवणे, साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडणे, रुग्णाबाबत नगरपालिका व आरोग्य विभागास कळवणे.
- ताप असेपर्यंत आराम करणे, भरपूर पाणी पिणे, पॅरासिटेमॉल गोळी घेणे.
- संभाव्य धोक्याबाबत माहिती असणे, तशी लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय मदत घेणे.
- ताप उतरल्यानंतरच आजार गंभीर वळण घेऊ शकतो. याची जाणीव असणे गरजेचे आहे.
- रक्तातील घटक फक्त रक्तस्राव असणा-या पेशंटसाठी राखून ठेवणे.
- या आजारासोबत अजून काही कारणामुळे रक्त घटक कमी झाले आहेत काय? हे वैद्यकीय अधिका-यांकडून जाणून घेणे.
 
http://www.facebook.com/drvilas.ujawane 
 

डॉ. विलास उजवणे (DrVilas Ujawane)

No comments:

Post a Comment

Visit Our Page