Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Wednesday, October 21, 2015

मधुमेह – आयुर्वेदाच्या चष्म्यातून.......

मधुमेह – आयुर्वेदाच्या चष्म्यातून.........
“मधुमेह किंवा डायबिटीस" अगदी शाळकरी मुलांनाही परिचित असे हे शब्द. ह्याविषयी शास्त्रीय आणि किचकट भाषेत अनेक लेख किंवा पुस्तके आपल्याला वाचायला मिळतात. मात्र साध्या-सोप्या, कोणालाही समजेल-उमजेल अशा भाषेत मधुमेहविषयक महत्वाची माहिती ह्याठिकाणी आपल्यासाठी सादर करीत आहोत. ही माहिती फक्त औषधांबद्दलच नव्हे तर रोग, रोगाची कारणे, उपद्रव, संरक्षणाचे उपाय ह्यांसह दैनंदिन व्यवहारात आहार, विहार, आचरण, सवयी ह्यांविषयी देखील आहे.
मधुमेह म्हणजे काय ? तो कसा होतो ?
रक्तातील साखरेचे प्रमाण असंतुलित होणे किंवा प्रमाणाबाहेर वाढणे म्हणजेच मधुमेह. शरीराला आवश्यक असलेल्या उर्जेसाठी आहारातून मिळालेल्या अन्नाचे साखरेत रुपांतर केले जाते. स्वादुपिंडातून पाझरणार्‍या इन्शुलिन नामक हार्मोनचा ह्या क्रियेत महत्वाचा सहभाग असतो. ह्यामुळे तयार झालेली साखर शरीराच्या पेशींमध्ये सामावली जाते. पुढे तिचे ग्लायकोजिनमध्ये रुपांतर होऊन ते यकृतात साठवले जाते. काही कारणांमुळे रक्तातील साखरेची पातळी खालावली तर अशा संग्रहित ग्लायकोजिनचे रुपांतर पुन्हा साखरेत होते. त्यामुळे रक्तातील साखर कमी होणे (हायपोग्लायसेमिया) व त्यापासून उद्भवणाऱ्या लक्षणांवर नियंत्रण राखले जाते. मधुमेह झालेल्या व्यक्तींत इन्शुलिन तयार होण्याची प्रक्रिया मंदावलेली किंवा थांबलेली असते. आवश्यक प्रमाणात इन्शुलिन तयार न झाल्यास शरीरातील साखरेचे प्रमाण वाढू लागते व मधुमेहाची सुरुवात होते.
मधुमेहाची कारणे ?
आस्यासुखं स्वप्नसुखं दधीनि ग्राम्यौदकानूपरसा: पयांसि l नवान्नपान्नं गुडवैकृतं च प्रमेहहेतु: कफकृच्च सर्वम् l l . . . . भावप्रकाश प्रमेहपिडिकाऽधिकारः ३८ / १
भरपूर आराम, जास्त झोप, दूध – दह्याचे पदार्थ, उसाचे पदार्थ, पाणथळ जागेतील प्राण्यांचे मांस, नवीन धान्य आणि कफ वाढवणाऱ्या इतर क्रिया वारंवार करणे अशा कारणांमुळे मधुमेह होतो.
मधुमेह होण्यापूर्वीची लक्षणे ?
दन्तादीनां मलाढ्यत्वं प्राग्रूपं पाणिपादयोः l दाहश्चिक्कणता देहे तृट् स्वाद्वास्यं च जायते ॥ . . . . . भावप्रकाश प्रमेहपिडिकाऽधिकारः ३८ / ५
दात, टाळू, गळा, जीभ अशा ठिकाणी नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात मल उत्पन्न होतो व चिकटा आल्यासारखी जाणिव होते. दात पिवळसर होतात. हातापायाच्या तळव्यांना आग होणे, टोचल्याप्रमाणे वेदना होणे इ. लक्षणे जाणवतात. मेदोदोषांमुळे अधिक प्रमाणात मलोत्पत्ती होते. श्वास दूर्गंधी असणे, अति तहान लागणे अशी लक्षणे मधुमेह होण्यापूर्वी दिसून येतात.
मधुमेहाची लक्षणे-
सामान्यं लक्षणं तेषां प्रभूताविलमूत्रता l l . . . . भावप्रकाश प्रमेहपिडिकाऽधिकारः ३८ / ६
वारंवार लघवीची भावना, थकवा, सतत तहान आणि भूक लागणे, मूत्रमार्गाची जळजळ, वजन कमी होणे अशी लक्षणे दिसतात. लघवीला मुंग्या लागल्या तर मधुमेह बळावला असे वृद्ध वैद्यांनी सांगितल्याचे येथे स्मरते.
मधुमेहाचे प्रकार-
सहजमधुमेह किंवा इन्शुलिन डिपेंडण्ट डायबिटीस (टाईप १ / “आय डी डी”):
हा मधुमेह बहुतेकवेळा जन्मतः असतो किंवा अगदी लहान वयातच होतो. आई वडिलांकडून, बीजदोषामुळे हा पुढच्या पिढीत येतो. तुलनेने हा अधिक त्रासदायक असतो, ह्याची चिकित्साही कटकटीची असते. ह्यामध्ये रुग्ण अधिकतर इन्शुलिनवरच अवलंबून असतो. आई वडिलांपैकी कोणाला मधुमेह असेल तर बहुतांशी पुढच्या पिढीतही तो उद्भवतो. पण चिकित्सा, आहार, विहार, व्यायाम ह्यांची सुनियोजित सांगड घातली तर अगदी ऐन विशीत होणार असेल तर तो दहा बारा वर्षे तरी नक्कीच पुढे ढकलता येईल.
कर्मज मधुमेह किंवा नॉन इन्शुलिन डिपेंडण्ट डायबिटीस (टाईप २ / “एन आय डी डी”) :
हा मधुमेह सामान्यतः वयाच्या तिशी – पस्तीशी दरम्यान किंवा नंतरही होतो. चुकीचा आहार आणि जीवनपद्धती हे ह्या विकाराचे मुख्य कारण असल्याचे दिसून येते. औषध सेवनाने हा प्रकार नियंत्रणात राहू शकतो. मात्र योग्य चिकित्सा न केल्यास किंवा इतर पथ्यपाणी न सांभाळल्यास शेवटी इन्शुलिनवर अवलंबित गंभीर अशा टाईप १ प्रकारात जाऊ शकतो.
गर्भावस्थाजन्य मधुमेह :
गर्भावस्थेत अन्तःस्रावी (हॉर्मोन्स) ग्रंथींचे संतुलन कमीअधिक होत असल्याने त्याचा परिणाम इन्शुलिनवर होतो. परिणामी अस्थायी स्वरूपाचा मधुमेह गर्भावस्थेत होण्याची शक्यता असते. सुमारे तिसऱ्या किंवा चौथ्या महिन्यात ह्याची शक्यता सर्वात अधिक असते.
शस्त्रकर्माच्या (ऑपरेशन) वेळी रक्तातील साखर नियंत्रणात असणे अत्यावश्यक असते. शिवाय तोंडावाटे काही औषध देता येत नसेल त्यावेळी इन्शुलिनला पर्याय नसतो. अशावेळी रुग्णाची रक्तातील साखर तपासून इन्शुलिनची मात्रा नक्की करतात. तसेच शस्त्रकर्माच्या वेळी अनेक औषधी दिल्या जातात, त्यांचा परिणाम म्हणून रक्तशर्करा पातळी कमीअधिक होऊ शकते. शस्त्रकर्मानंतर सर्व स्थिरस्थावर झाल्यावर इन्शुलिन बंद करून पुन्हा नेहमीच्या औषधांची सुरुवात करता येते.
मधुमेहाचे उपद्रव -
ह्यामध्ये हृद्रोग, मज्जायंत्रणेचे (सेन्ट्रल नर्व्हस सिस्टिम) विकार, वृक्क (किडनी) विकार, डोळ्यांचे विकार, पायांचे विकार, कानाचे दोष, त्वचारोग, स्मृतिभ्रंश हे प्रमुख आजार संभवतात. मधुमेहात रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसेराईड्स सारखी चरबी वाढते. शिवाय काठिण्य (अथेरोस्क्लेरोसिस) होऊन रक्तवहन होण्यात अडथळे निर्माण होतात. शरीरातील सर्वच महत्वाच्या अवयवांना प्राणवायूची आवश्यकता असते जी रक्तामार्फत पुरी केली जाते. ह्या अडथळ्यांमुळे प्राणवायूचा पुरवठा खंडित होऊन महत्वाच्या यंत्रणेतील पेशी मृत होऊ लागतात. अशा प्रकारे मधुमेहाचे उपद्रव निर्माण होतात. त्यामुळे केवळ रक्तातील शर्करा नियंत्रण करून मधुमेहाची चिकित्सा पूर्ण होत नाही. तर शरीरातील ह्या प्रमुख अवयवांवर होणाऱ्या आघातांपासून संरक्षण करणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे. मधुमेहाला ‘सायलेंट किलर’ का म्हणतात हे आता आपल्या लक्षात आले असेल.
मधुमेहात पथ्यापथ्य –
भरपूर आराम, जास्त झोप, दुग्धजन्य पदार्थांचे अति सेवन, गोड पदार्थ, मांसाहार, नवीन धान्य आणि कफ वाढवणाऱ्या इतर क्रिया वारंवार करणे ही मधुमेहाची कारणे आपण वर पाहिली. कोणत्याही रोगाची चिकित्सा करण्याचा कानमंत्र म्हणजे “रोग होण्याची कारणे टाळणे”.
आराम : मधुमेहींनी “आराम आहे हराम” ही म्हण नेहमी लक्षात ठेवावी. विशेषतः आनुवंशिक मधुमेह होण्याची ज्यांना शक्यता आहे त्यांनी तर ह्या म्हणीला प्राणापलीकडे लक्षात ठेवले पाहिजे. नित्य व्यायामाने शरीरात उर्जा किंवा उष्णता निर्माण होते परिणामी शरीरातील चरबी घटते. व्यायामाने रक्तसंवहन सुधारते व महत्वाच्या अवयवांना अखंडित रक्तपुरवठा मिळण्यास मदत होते. अतिरिक्त चरबी मधुमेहासाठी अत्यंत घातक आहे हे विसरून चालणार नाही. अव्यायाम हा देखील शरीरात जडपणा निर्माण करतो, पर्यायाने ह्यानेही कफ वाढतो.
झोप : लवकर निजे लवकर उठे l त्यासी आयुसंपदा लाभे आरोग्य ll ह्या म्हणीचे शब्दशः पालन केल्यास लाभही तसेच होतात. कोंबडा आरवणे, पक्षांचा किलबिलाट, गायी म्हशींचे हंबरणे हे ब्राह्म मुहूर्तावर म्हणजेच भल्या पहाटे सुरु होते. सूर्य मावळल्यावर मात्र सर्व काही शांत, हे आहे निसर्गचक्र. अशा निसर्ग चक्राचे पालन करणे मधुमेहासाठी नक्कीच हितावह आहे.
आपल्या पूर्वजांनी सूचक शब्दातून मुलभूत सिद्धांत मांडले आहेत. ‘साखरझोप’ हा त्यातीलच एक प्रचलित शब्द. ब्राह्म मुहूर्तानंतर झोपून राहणे म्हणजे ‘साखरझोप’. एका संशोधनात सुमारे दोन हजार व्यक्तींची रक्तशर्करा साखरझोपेपूर्वी उठवून तपासली. ठराविक दिवसांनी ही तपासणी साखरझोपेनंतर केली. ह्या दोन्ही तपासण्यांमध्ये जवळजवळ २० अंशांची वाढ झालेली आढळली. साखरझोपेमुळे रक्तातली साखरेची पातळी खरोखरच वाढते हा ह्या संशोधनाचा निष्कर्ष.
दूध-दह्याचे पदार्थ : क्षीराद, क्षीरान्नाद, अन्नाद असे मानवी वयाचे तीन गट आयुर्वेदात सांगितले आहेत. ‘क्षीराद’ म्हणजे फक्त दूध पिण्याचे वय. जन्मापासून उष्टावणाच्या वयापर्यंतचे हे वय. ह्या वयानंतर दुधाचे दात पडेपर्यंत ‘क्षीरान्नाद’ काळ. म्हणजेच दूध व अन्न दोन्हीही सेवन करण्याचा काळ. त्यानंतर ‘अन्नाद’ काळ सुरु होतो. म्हणजेच “आता दूध बंद, फक्त अन्न सेवन”.
गायी म्हशीदेखील वासराला एका विशिष्ट वयापर्यंत दूध पाजतात, त्यानंतर मात्र त्याला लाथ मारून हाकलतात. निसर्गाची नियमावली माणसापेक्षा प्राण्यांना जास्त चांगली समजते. ह्या विषयात एकंदर लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे, दुधाचे दात पडून पक्के दात आले की दूध किंवा दुधाचे पदार्थ नियमितपणे घेऊ नयेत.
आजकाल मिळणारे जर्सी गायीचे दूध तर ‘ए१’ प्रकारचे. ‘ए१’ चा अर्थ सर्वोत्तम असा नसून हे दूध युरोपात पिण्यास अयोग्य असल्याचे समजते.
हितं अत्यग्नि अनिद्रेभ्यो गरीयो माहिषं हिमम् . . . . अष्टांगहृदय, सूत्रस्थान ५/ २३
ज्यांना अति भूक लागते त्यांनी किंवा झोप येत नसेल त्यांनीच फक्त म्हशीचे दूध प्यावे. म्हणजे दुधाने भूक मंदावते आणि झोपही अधिक येते. मधुमेह रुग्णांसाठी ह्या दोन्ही गोष्टी निषिद्ध आहेत. म्हणून दूध व दुधाचे पदार्थ मधुमेहासाठी हितकर नाहीत हे लक्षात ठेवावे.
गोड पदार्थ : मधुमेह म्हटला की गोड पदार्थ टाळावेत हे सांगण्याची गरजच नाही. निसर्गाने गोडाबरोबर बहुतेकवेळा तुरट चव जोडून दिली आहे. आंब्याच्या सालीचा तुरटपणा हा त्यातील गोडाचे संतुलन राखण्यासाठी दिला आहे. पशुपक्षी अशी फळे सालीसकट खातात तर मनुष्य त्यातील फक्त गोड भागच घेतो, त्याला संतुलित करणारा तुरटपणा फेकून देतो. शक्य असेल तेथे गोडाबरोबर तुरट रस घ्यावा हा गर्भितार्थ लक्षात घ्यावा. श्रीखंड, बासुंदी सारख्या गोड पदार्थांबरोबर केशर, जायफळ, वेलची घालण्याचे हेच प्रयोजन असावे.
मांसाहार : निसर्गाने मानवी शरीराची जडणघडण फक्त शाकाहार सेवनासाठीच केली आहे. त्यातूनही ज्यांना मांसाहार आवडत असेल त्यांनी तो अतिशय मर्यादित प्रमाणात घ्यावा. मात्र त्यासोबत पालेभाज्या घेणे आवश्यक आहे. मांसाहारात फायबर्स नसतात त्यामुळे हा आहार सुद्धा कफ वाढवण्यास कारणीभूत होतो.
नवीन धान्य : नव्या धान्यात ओलावा अधिक असतो त्यामुळे ते पचायला जड व अभिष्यंदी असते. तेच एक वर्ष जुने झाले की त्यातील ओलावा कमी होतो व पचायला हलके होते. असे जुने धान्य उपलब्ध नसल्यास दुष्परिणाम टाळण्यासाठी ते भाजून मगच आहारात वापरावे. भाजणीसाठी ज्याप्रमाणे धान्य भाजून घेतात त्याचप्रमाणे नव्या धान्याचा वापर मधुमेहींनी करावा.
उसळींच्या किंवा इतर कोणत्याही स्वरूपात मोड आलेल्या कडधान्यांचा वापर मधुमेहींनी टाळावा.
धान्य भिजत ठेवल्याने त्यातील ओलावा व गोडवा वाढतो. मोड आलेली मेथी चवीला गोड लागते म्हणजेच त्यात कफ निर्माण करण्याची प्रक्रिया बळावते.
कफवर्धक गोष्टी : गोडाने कफ वाढतो. थंड पाणी, शीतपेय, केळी, आईसक्रीम, मैद्याचे पदार्थ, श्रीखंड, बासुंदी असे पदार्थ कफ व पर्यायाने मधुमेह वाढवणारे असतात. त्यांच्यापासून चार हात लांब राहणे योग्य समजावे. आहारात मैद्याच्या पदार्थांचे वारेमाप सेवन हे मधुमेहाचे एक ठोस कारण म्हणून सिद्ध झाले आहे.
गव्हातील कोंडा किंवा फायबर्स काढून मैदा तयार केला जातो. फायबर्समुळे अन्नघटकात ‘लेखन’ गुण जोपासला जातो. त्यामुळे चिकटपणा खरवडून काढण्यात हे फायबर्स उपयोगी ठरतात. मैदा निर्माण प्रक्रियेत ग्लूटीन नावाचे एक चिकट स्वरूपाचे प्रथिन तयार होते. ह्या ग्लूटीनमुळे संपूर्ण पचन यंत्रणेत चिकट लेप तयार होतो. चिकटपणा हा कफाचा गुण आह. ह्या लेपामुळे अन्न शोषणात अडथळा निर्माण होतो आणि पाचकस्रावांचा अवरोध होतो.
मधुमेहाची परिपूर्ण चिकित्सा –
मधुमेह आणि त्याच्या उपद्रवांपासून मुक्तीसाठी ‘मधुमुक्ता’ (लिक्विड व टॅबलेट)
मधुमुक्ता (लिक्विड व टॅबलेट) मुळे रक्तातील साखरेचे नियंत्रण उत्तम प्रकारे होतेच शिवाय मधुमेहाच्या उपद्रवांवर एक अभेद्य संरक्षक कवच निर्माण होते. ह्यातील प्रत्येक वनस्पतीच्या गुणधर्मांचा आढावा घेतल्यावर ही गोष्ट नक्कीच स्पष्ट होईल.
मधुमुक्ता (लिक्विड) : घटक द्रव्ये
गुळवेल : गुळवेल ह्या वनस्पतीच्या नावात जरी गूळ असला तरी मधुमेहात ही वनस्पती म्हणजे हुकमी एक्काच आहे. रक्तातील साखरेचे नियंत्रण करणाऱ्या कितीतरी वनस्पती आहेत, परंतु स्वादुपिंडाचे कार्य पूर्ववत करणाऱ्या वनस्पती अगदी मोजक्याच आहेत. गुळवेल ही त्यात अग्रक्रमावर आहे. मधुमेहात होणारा दृष्टिदोष (रेटिनोपॅथी), मज्जातंतूंचे विकार (न्युरोपॅथीज), आमाशयक्षोभ (गॅस्ट्रोपॅथी), वृक्कदोष (नेफ्रोपॅथी), पायांच्या जखमा (डायबेटिक फूट), मेंदुविकार, यकृतविकार, हृदयविकार, रक्तातील चरबी, मधुमेहजन्य शुक्रदौर्बल्य, अस्थिक्षय (ऑस्टिओपोरोसिस) अशा सर्वच उपद्रवांवर गुळवेल उत्तम कार्य करते.
गुळवेलीच्या गुणवत्तेची परिसीमा म्हणजे गर्भावस्थेत होणारा मधुमेह व त्याचे गर्भावर होणारे दुष्परिणाम ह्याने थांबवता येतात. स्वादुपिंडात बीटा जातीच्या कोशिकांमधून इन्शुलिन तयार होत असते. ह्या बीटा कोशिकांना मारक पेशी शरीरात वाढल्यावर इन्शुलिनची कमतरता झपाट्याने होऊ लागते. गुळवेलीतील विशेष घटक ह्या पेशींना प्रतिरोध करून इन्शुलिन स्रावांना प्रेरणा देतो.
मेषशृंगी : गुडमार हे वनस्पतीचे दुसरे नाव. मधुर अर्थाने गुड हा शब्दप्रयोग केला आहे. अर्थात, मधुरनाशक म्हणून ह्या वनस्पतीला ‘गुडमार’ म्हटले आहे. मधुमेहात ह्या वनस्पतीचे कार्य निरनिराळ्या पद्धतीने होते. १) हिच्या सेवनाने स्वादुपिंडातील आयलेट ऑफ लॅंगरहॅन्स कोशिकांचे पुनरुत्पादन होते २) इन्शुलिनच्या स्रावांमध्ये वाढ होते ३) आतड्यांमधून साखरेचे रक्तात शोषण रोखले जाते ४) रक्तातील वाढलेल्या साखरेचा पुरेपूर वापर मांसादि पेशींमध्ये केला जातो. ह्याशिवाय मेदनाशक, रक्तातील चरबी नियामक (कोलेस्टेरॉल इ.), जंतुनाशक व सूज नियंत्रण करण्याचे गुण आहेतच.
निंब : निंब म्हणजेच कडुलिंब. निंब सेवनाने इन्शुलिनची गरज ६० ते ७०% नी कमी होत असल्यामुळे इन्शुलिनवर अवलंबून असणाऱ्यांना ह्याचा विशेष उपयोग होतो. मधुमेहात रक्तवाहिन्यांमध्ये काठीण्य निर्माण होते. त्यामुळे शरीरातील महत्वाच्या अवयवांना रक्तपुरवठा खंडित होतो. ही विकृती वाढत गेली तर गॅंग्रीन होऊन अवयव कापण्याची वेळ येऊ शकते. रक्तसंवहन सुरळीत करण्याची विशेष किमया ह्या वनस्पतीत असल्यामुळे हा धोका टळतो. मधुमेहात अनेक त्वचाविकार होतात. त्वचारोगात ही वनस्पती किती उपयोगी आहे हे किमान भारतात तरी कोणाला सांगण्याची गरज नाही.
सप्तरंगी : इन्शुलिन रेझिस्टन्स म्हणजे शरीरातील पेशींवर इन्शुलिनचा परिणाम न होणे. अशा परिस्थितीत रक्तातील साखर वाढतच राहते. सप्तरंगीच्या सेवनाने हा रेझिस्टन्स नियंत्रणात राहतो व रक्तातील साखरेचे शोषण शारीरिक धातूंमध्ये होऊन तिचे रक्तातील प्रमाण कमी होते. रक्तातील वाढलेल्या साखरेमुळे काही पेशीविघातक घटक (फ्री रॅडिकल्स) उत्पन्न होतात व त्यांचाच दुष्परिणाम लिव्हर, किडनी, रेटिना अशा यंत्रणांवर होतो. सप्तरंगीमध्ये असलेल्या पेशीरक्षक गुणांमुळे ह्या दुष्परिणामांपासून बचाव होतो.
आमलकी : आमलकी म्हणजे आवळा. व्हिटामिन सी चा नैसर्गिक स्रोत असलेले हे फळ आहे. ह्याने शरीराची रोगप्रतिकारक्षमता अत्युत्तम राहते. मधुमेही रुग्णांना आमलकी नियमितपणे दिल्याने त्यांची जेवणाअगोदरची व नंतरची रक्तातील साखर आणि रक्तकणांशी संलग्न साखर (ग्लायाकोसायलेटेड हिमोग्लोबिन) उत्तमप्रकारे नियंत्रणात राहते. ह्याशिवाय रक्तातील चरबीचे (कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसेराइड्स इ.) प्रमाण देखील चोख राहते.
बिल्वपत्र : मज्जातंतुंच्या विकारामुळे (न्युरोपॅथीज) शरीरातल्या विविध भागात असह्य वेदना निर्माण होतात. बिल्वपत्राचा विशेष उपयोग ह्या ठिकाणी होतो. मधुमेहाच्या नियंत्रणाबरोबरच विशेष करून वृक्क (किडनी) संरक्षण आणि दृष्टिदोष (कॅटरॅक्ट) वर ह्याचा हुकमी उपयोग होतो.
हरिद्रा : हरिद्रा म्हणजे हळद. कॅन्सर, सूज, पेशीरक्षण, रक्तवाहिन्यांमधील अडथळे (थ्रोम्बस), रक्तवाहिनी काठिण्य (अथेरोस्क्लेरोसिस), हृद्रोग, नाडीसंरक्षण (न्युरोप्रोटेक्शन), स्मरणशक्ती, कंपवात (पर्किन्सन्स डिसीज), संधिवात, जंतुसंसर्ग, वयस्थापन, सोरियासिस आणि अपस्मार (फिट्स येणे) अशा अनेक विषयांवर प्रदीर्घ संशोधन होऊन हळदीची गुणवत्ता वाखाणली गेली आहे. मधुमेही स्त्रीला गर्भधारणा झाली तर गर्भाच्या मेंदूचे कवच सांधणाऱ्या यंत्रणेचे (न्यूरल ट्यूब) विकार होण्याची दाट शक्यता असते. हळदीच्या सेवनाने हे कवच सांधण्याची क्रिया चोख होते.
जांभुळबीज : मधुमेहासाठी एक उत्तम फळ म्हणून जांभळाची ओळख आहे. वास्तविक जांभळाचे फक्त बी मधुमेहासाठी उपयुक्त आहे. जांभळाचा रस रक्तातील साखर वाढवतो. त्यामुळे मधुमेहींनी जांभळाचा रस उपयुक्त समजून सेवन करणे हमखास धोकादायक ठरू शकते.
जांभळाच्या बियांचा मधुमेहासाठी उपयोग प्राचीन काळापासून अवगत आहे. इन्शुलिनचा शोध लागण्यापूर्वीच मानवाला हा शोध लागला होता. जांभुळबीज सेवनाने रक्तातील इन्शुलिनचे प्रमाण तीन पटीने वाढते व रक्तातील चरबी नियंत्रणात राहते.
कारले : कारल्याने स्वादुपिंडातील इन्शुलिन निर्माण करणाऱ्या पेशींना चालना मिळते, आतड्यातून साखरेचे शोषण कमी होऊन पेशींमध्ये शोषण वाढते. अशा तीन प्रकारे मधुमेह नियंत्रणाचे काम कारल्याने होते.
चिरायता : रुग्ण मधुमेही असो किंवा नसो, रक्तातील साखरेची पातळी ७० मिलीग्राम प्रति डेसिलिटरपेक्षा खालावली तर त्याला हायपोग्लायसेमिया म्हणतात. मधुमेहासाठी चिकित्सा घेत असतांना हायपोग्लायसेमिया होण्याची शक्यता असते. अशावेळी बौद्धिक संभ्रम, चक्कर, अंगाचा थरकाप, भूक, डोकेदुखी, चिडचीड, नाडी मंद होणे, हृदयाची धडधड, त्वचा पांढरीफटक पडणे, दरदरून घाम सुटणे, थकवा अशी लक्षणे उत्पन्न होतत. चिरायता वनस्पतीतील विलक्षण खुबीमुळे रक्तातील वाढलेली साखर कमी होते पण आवश्यक पातळीपेक्षा खाली जात नाही.
कुलिंजन : मधुमेह नियमन करण्याचे उत्तम कार्य ह्याने होतेच शिवाय वृक्कांवर (किडनी) होणारा मधुमेहाचा दुष्परिणाम रोखण्याचे आणि रक्तातील चरबी (कोलेस्टेरॉल इ.) नियंत्रण करण्याचे विशेष सामर्थ्य ह्या वनस्पतीत आहे.
त्रिवृत : मधुमेहात हातापायांची आग होणे, अपचन, बद्धकोष्ठ, तहानेने घसा कोरडा पडणे अशी लक्षणे होतात. ह्या लक्षणांवर उपयोगी असलेली ही गुणकारी वनस्पती आहे.
विजयसार : ह्यामुळे रक्तातील वाढलेली साखर मांसपेशीत शोषली गेल्याने मधुमेहाचा त्रास होत नाही. शक्ती टिकून राहते, थकवा येत नाही, मरगळही नाहीशी होऊन उत्साह वाढतो. त्याचबरोबर रक्तातील चरबी घटते, इन्शुलिनची पातळी वाढते आणि मधुमेहाला चांगलाच चाप बसतो.
यष्टिमधु : हजारो वनस्पतींपैकी अगदी मोजक्याच वनस्पती चवीला “गोड” आहेत. त्यापैकी एक आहे यष्टिमधु. सामान्यतः गोड वनस्पती मधुमेहात कशी उपयोगी पडेल अशी शंका अगदी स्वाभाविक आहे. यष्टिमधुमध्ये अमोरफ्रूटिन नावाचा घटक असतो. इन्शुलिनची क्रिया पिपरी (PPARγ) नामक नाडिकेंद्रावर (रिसेप्टर्स) होते, त्याच पेशींवर ह्या अमोरफ्रूटिनचा प्रभाव पडतो. ह्या पेशी मेद आणि साखरेचे नियोजन करतात. अमोरफ्रूटिनच्या प्रभावामुळे इन्शुलिनचा प्रतिरोध (इन्शुलिन रेझिस्टन्स) कमी होतो व अशा प्रकारे कार्य करून ही वनस्पती मधुमेहात उपयोगी पडते.
मधुमुक्ता (टॅबलेट)-
दारुहरिद्रा, देवदार, नागरमोथा, त्रिफळा ह्या चार विशेष घटकांची जोड गुळवेल, जांभुळ बीज, कारले ह्यांना देऊन मधुमुक्ता (टॅबलेट) ची निर्मिती केली आहे. द्रव्यांचे विशिष्ट गुणधर्म व आयुर्वेदीय औषधी निर्माण सिद्धांत तसेच भावना व मर्दन ह्या संस्कारांमुळे होणारे गुणवर्धन अशा विविध बाबींचा विचार ह्या निर्मितीमागे आहे.
टॅबलेटमधील घटक भिन्न आहेत, त्यांची कार्मुकता देखील भिन्न आहे. ह्यातील वनस्पतींमध्ये उडनशील तेलांचा अंश आहे. लिक्विड निर्मितीच्या प्रक्रियेतील उष्णतेमुळे ह्या तेलांची वाफ होऊन त्यातील कार्यकारी घटक नाहीसे होऊ शकतात म्हणून ह्या वनस्पतींना टॅबलेटच्या रूपात सादर केले आहे.
मधुमेह रुग्णांनी लिक्विड व टॅबलेट ह्यांचे सेवन एकत्रितपणे करावयाचे आहे. लिक्विड व टॅबलेट एकमेकांना पर्याय नाहीत. टॅबलेटमधील विशेष घटकांची कार्मुकता पुढील प्रमाणे.
दारुहरिद्रा : रक्तशर्करा नियमन करून रक्तातील चरबीचे संतुलन हिने राखले जाते. एल. डी. एल. आणि एच. डी. एल. अशा दोन प्रकारच्या चरबी रक्तात असतात. हृदयरोगाच्या दृष्टीने एल. डी. एल. (लो डेन्सिटी लायपोप्रोटीन्स किंवा बॅड कोलेस्टेरॉल) चे प्रमाण १०० मिलीग्राम / डेसिलिटर पेक्षा कमी असावे लागते. ह्यासाठी अनेक वनस्पती उपयोगी असलेल्याचे दिसून येते. एच. डी. एल. म्हणजे हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन्स किंवा गुड कोलेस्टेरॉल. ह्यांची पातळी ६० मिलीग्राम / डेसिलिटर पेक्षा अधिक असावी. ही पातळी वाढवणारी औषधी द्रव्ये मात्र मोजकीच आहेत. दारुहरिद्रा सेवनाने हे प्रमाण सुयोग्य पातळी इतके वाढते व त्यामुळे हृदयविकाराचा धोका टळतो.
देवदार : सामान्यतः यकृतविकाराचा संबंध मद्यपानाशी जोडला जातो. परंतु मधुमेहाशी देखील यकृतविकारांचा घनिष्ट संबंध आहे. मद्यपान न करता देखील मधुमेहींना फॅटीलिव्हर नावाचा विकार होण्याची शक्यता अधिक असते. देवदाराने फॅटीलिव्हर विकारावर चांगलाच लगाम बसतो. एस.जी.ओ.टी., एस.जी.पी.टी., कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसेराइड्स अशा यकृतरोग सूचक घटकांचे संतुलन ह्याने राखले जाते. शिवाय ह्यातील बहुमोली पेशीरक्षकांमुळे शरीराची एकंदर रोगप्रतिकारक्षमता खणखणीत राहते.
नागरमोथा : ह्या द्रव्याची कार्मुकता निराळीच आहे. ह्याच्या सेवनाने आहारातील साखरेचे रक्तात शोषण अतिशय मंदगतीने होते. अल्फा ग्लूकोसायडेज इन्हिबिटर व अल्फा अमायलेझ इन्हिबिटर अशा दोन प्रक्रियांमुळे हे कार्य साध्य होते. त्यामुळे जेवणानंतर रक्तातील शर्करा वाढण्याच्या अवस्थेत नागरमोथ्याचे विशेष कार्य घडते. ह्या क्रियेत आहारातील कर्बोदके इन्शुलिनला अधिक काळ प्रेरणा देऊ शकतात. हातापायांची जळजळ, जखमा भरून काढणे, अपचन, मेदोरोग, विविध जन्तुंपासून संरक्षण करण्याची आगळीच किमया ह्या वनस्पतीत आहे.
त्रिफळा : मधुमेहातील रक्तशर्करा नियंत्रणाखेरीज अनेक गुण ह्या सम्मिश्रणात दडलेले आहेत. उत्तम पेशीरक्षक (अॅंटिऑक्सिडंट), सूज कमी करणे, ज्वरनाशक, वेदनाशामक, जंतुसंसर्गनाशक, जनुकदोषनिवारक, जखमा भरून काढणे, कॅन्सर प्रतिरोधक, मानसिक क्लेशनिवारक, वयस्थापन, किरणोत्सर्जनाचे दुष्परिणाम रोखणे अशा अनेक गुणांनी त्रिफळा समृद्ध आहे. बद्धकोष्ठ, भूक मंदावणे आणि अम्लपित्त ह्या विकारांवर तर हे सुप्रसिद्ध आहेच.
मधुमुक्ता कोणी घ्यावे?
• मधुमेहग्रस्त रुग्णांनी
• ज्यांच्या घराण्यात मधुमेह आहे त्यांनी, संरक्षणार्थ
• ज्यांना मधुमेह होण्याची लक्षणे दिसू लागली आहेत
• गर्भावस्थेत मधुमेह झाल्यास
• इन्शुलिनवर विसंबूनअसलेल्यांनी इन्शुलिन मात्रा कमी करण्यासाठी
• मेदरोगाने त्रस्त असलेल्यांनी सहाय्यक म्हणून
• रक्तातील चरबी कमी करण्यास सहाय्यक म्हणून
सेवन विधी :
मधुमुक्ता लिक्विड १५ – १५ मिली सोबत २ – २ मधुमुक्ता टॅबलेट दिवसातून २ वेळा, रिकाम्यापोटी. एक दिवस.

Manoj Anant Joshi(मनोज अनंत जोशी)

No comments:

Post a Comment

Visit Our Page