Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Thursday, November 26, 2015

आहारयोग

आहारयोग

लेख क्रमांक 2 -
आज आहाराच्या अयोगाविषयी जाणून घेऊया.
अयोग म्हणजे कमी खाणे, गरजेपेक्षा कमी अन्न सेवन करणे, कमी वेळा सेवन करणे, भूक लागूनही न खाणे, वेळेवर वा अवेळी पण निकस, सत्त्वरहित, refined अन्न खाणे, अन्नातून जे गुण बल, ओज, स्थैर्य, पुष्टि, समाधान इ. मिळणे आवश्यक आहे ते न मिळणे म्हणजे अयोग.
हल्ली केवळ वजन कमी करणे वा सडपातळ दिसणे या कारणासाठी dieting चे फॅ़ड आलेले दिसते आहे. विविध औषधे- गोळ्या- वरून लावायचे लेप, spot reduction, यांबरोबरच अनेक 'diet' foods वा weight loss supplements, fat burners इ. नावांनी अगणित उत्पादनांच्या जाहिरातींचा मारा होताना दिसतोय. यातील योग्य-अयोग्य काय हे ठरविणे अवघ़ड होत चाललेले आहे कारण बरेचदा अनेक वैद्यकीय व्यावसायिकही अशा उत्पादनांचे वा सेवांचे promotion / endorsement - करताना दिसतात. ज्याअर्थी एक डाॅक्टरच सांगतो आहे त्या अर्थी ते बरोबरच असेल असे स्वत:चे समाधान करून घेतले जाते. जसे नट-नट्या फक्त पैश्यांसाठीच जाहिराती करतात- त्या वापरत नाहीत तसेच हेही आहे. कोणीही वैद्यकीय व्यावसायिक जर व्यक्तिला वा रुग्णाला न तपासता सरसकट एखाद्या उत्पादनाची जाहिरात करत असेल तर ते चूकच आहे. कायद्याने तर वैद्यकीय व्यावसायिकांना अश्या विशिष्ट उत्पादनांचे endorsement / promotion करण्यावर बंदीच आहे. म्हणजे कायद्याने चूक असलेल्या गोष्टींचाही आपण कसा स्वतःसाठी गैरवापर करतो? त्यातून जर कालांतराने त्या उत्पादनाने वा सेवेने कोणाला त्रास झाला, कोणत्या चाचणीत त्या गोष्टी अहितकारक आहेत असे दिसले तर मात्र आपण पुन्हा सरकारलाच दोषी ठरवून मोकळे होतो. जरी या वस्तू वा उत्पादने योग्य रीतिने तयार झाल्या तरी त्या सेवन करणे योग्य कसे? केवळ दोन मिनिटात भूक मिटवणारा पदार्थ हा वेळेअभावी सोयीस्कर असेलही पण म्हणून तो शरीरास हितकर आहे असे कसे म्हणू शकतो आपण? म्हणून कोणतेही बाजारी तयार अन्न मग ते packed food असो वा ready-mixes असो वा parcel असो - ते योग्य आहे का - पूर्ण जेवणाचा फायदा देणार आहे का की नुसतेच चमचमीत खाऊन पोटची खळगी भरून खोटे समाधान देणारे आहे याचाही विचार करा.
भूक नसतानाही वारंवार थोडे थोडे खात राहाणे - दर दोन तासांनी तोंड उष्टावणे यानेही शरीराची खाण्याची गरज भागत नाहीच तसेच व्यवस्थित जेवणाने मिळणारे समाधानही मिळत नाही. चटकन वजन कमी होण्यासारखे (दुः)परिणाम याचे असतीलही पण तिकडे कोण लक्ष देणार? सडपातळ दिसणे- दिसण्यावरून वाहवा मिळवणे यासाठी तर हा अट्टाहास.
बरे असे कमी व अयोग्य खाण्याचे इतर दुष्परिणाम काय तर याने अंगातील रक्त कमी होते, शरीराचे बल वा ताकद कमी होते, त्वचा रूक्ष होते, केस गळतात, लवकर पांढरे होऊ लागतात, सांधे झिजायला लागतात, कमी कष्टानेही दम लागतो, चिडचिड होते, सतत काहीतरी दुखत राहाते, झोप पुरत नाही वा लागतच नाही, मानसिक धैर्य ही कमी होते. त्यातून काही आजारपण आले तर त्यासाठी प्रतिकारशक्ती कमी झाल्याने आजारपण लांबते. शिवाय आजारांचे स्वरूपही गंभीर असते.
बघा बरं - केवळ बारीक दिसण्याच्या अट्टाहासासाठी वा केवळ जेवायला वा योग्य अन्न शिजवायला नाही म्हणून मिळेल ते तोंडात वेळी-अवेळी टाकल्याने आपण स्वतःलाच फसवत असतो.
वाहनात इंधन नाही वा चाकांत हवा भरली नाही वेळेवर तर आपण तिथे हयगय करत नाही - लगेच भरतो कारण ती गैरसोय टाळणे आपल्याला सुचते व आपण तसे जमवतोही. भले दोन पैसे जास्त जाऊदे पण वाहनाचे नुकसान नको म्हणून इंधनही उच्च प्रतीचे भरतो. मग देवाने दिलेल्या या सुंदर आजन्म बरोबर असणाऱ्या आपल्या शरीराकडे आपण का बरे दुर्लक्ष करतो - कारण ते बिचारे सहन करत राहते. काहीतरी बिनसतय हे सांगायचा ते प्रयत्नही करत राहते पण आपण मात्र चक्क दुर्लक्ष करतो किंवा मागील लेखात लिहिल्याप्रमाणे तात्पुरते उपाय करतो. अति झाल्यास मात्र दीर्घकालीन व महागड्या तपास्ण्या-उपाययोजना कराव्याच लागतात. त्यापेक्ष्या वेळीच तहान-भूक, मल-मूत्र प्रवृत्ति, झोप येणे इ. शरीराच्या रोजच्या छोट्या पण महत्त्वाच्या संवादाकडे नीट लक्ष द्या. बघा बरे तुमचे शरीर तुमच्याशी काय आणि कसा संवाद साधतेय - जरा कान देऊन - मन लावून - पुस्तके-फोन-टीव्ही-इंटरनेट बंद ठेवून एकदा ऐका तरी..
© वैद्य तनुजा गोखले,
पुणे.
tanugokhale@gmail.com
twitter handle - tanugokhale
संपर्क - 9765383735

No comments:

Post a Comment

Visit Our Page