Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Thursday, November 26, 2015

आहारयोग

आहारयोग
लेख क्रमांक - 1
अन्न-पान हे प्रत्येक जीवाचे जगण्यासाठीचे साधन. मूलभूत गरज. पण मनुष्याच्या बाबतीत ही गरज चैनीचे रूप कधी घेते हेच कळत नाही. जसा आर्थिक स्तर उंचावतो तसा गरजेतून चैनीकडे प्रवास सुरू होतो. जगण्यासाठी खाणे हे वास्तव खाण्यासाठी जगणे यात बदलते आणि जोवर काही रोगनिदान वा त्रास होत नाही तोवर बिनबोभाट सुरू राहते. एकदा का काही बिनसू लागले, शारीरिक वा मानसिक तक्रारी जाणवू लागल्या की मग त्यांच्या तीव्रतेनुसार घरातील वडिलधाऱे, शेजार-पाजारी, सहकारी यांना विचारून वा दूरदर्शन, वृत्तपत्रातील जाहिराती वाचून नाहीतर सरळ कोपऱ्यावरच्या केमिस्टकडून मनानेच वा त्याच्या सल्ल्याने औषध(?) घेऊन उपाय केल्याचे तात्पुरते समाधान मिळवणे असे प्रथमोपचार केले जातात. काही बहाद्दर तर फेसबुकवरही आपल्या लक्षणांचा वा त्रासाचा जाहीर प्रचार-प्रसार करतात व तिथे सल्ले मिळवतात. ते योग्य असतातच असे नाही कारण प्रश्नकर्त्याच्या तक्रारी, सवयी, जीवनशैली याविषयी काहीही माहिती न घेता वा विचारता सर्वचजण ऐकीव वा स्वानुभवातून सल्ले देऊ लागतात. अगदी घरगुती उपायांपासून ते विविध पेन-कीलर्स, अँटीबायोटीक्स, अँटीहिस्टामिनिक्स्, व्हिटॅमिन्स्, स्टिराॅईडस् इ. च्या गोळ्या, सिरप, मलमे, इ प्रिस्क्रीप्शन, तसेच जिम लावा, चालायला जा, टेकडी चढा, पोहायला जा असेही सल्ले व्यक्ति-प्रकृति न बघता दिले जातात. यातून कधीतरी तात्पुरते बरे वाटते तर कधी त्रास वाढतो आणि मग मात्र वैद्यकीय सल्ला घेणे भाग पडते. केवळ तुमच्या लक्षणांवर व माहितीवर अवलंबून न राहता तपासण्यांचा सल्ला दिला जातो. त्यात काही त्रास दिसला तर त्यावरील विशेष औषधे दिली जातात. अन्यथा मानसिक कारणे आहेत असा निष्कर्ष काढला जातो. गरजेनुसार स्पेशालिस्ट वा मानसोपचारतज्न्याचा वा तात्पुरते औषध देऊन घरचा रस्ता दाखवला जातो. येथेच हे चक्र संपत नाही तर पुनःपुन्हा चालू राहाते. कालांतराने हृदयरोग, प्रमेह, संधिवात, दमा, त्वचारोग, कर्करोग, इ. भारदस्त रोग कायमचे ठाण मांडतात. त्यांचा पाहुणचार म्हणून तपासण्या व औषधे ही जन्मभरासाठी सोबत करतात. आपल्या नातेवाईकांना विशेषतः आई-वडिलांना होणारा त्रास आपल्याला व्हायला लागला की तो आनुवंशिकच आहे असे समजूत करून घेतली जाते पण तो आपल्यालाही होउ शकतो याची कल्पना असूनही त्यासाठी preventive काही केले मात्र जात नाही. अश्या गंभीर-दीर्घकालीन रोगांचे निदान झाल्यावर मात्र आहाराविषयी, जीवनशैली सुधारण्यासाठी जरा जागरूकता येते, त्या आजाराविषयी अनेक सल्ले दिले - घेतले जातात, विविध पुस्तके-साईट्स् वर माहिती मिळवून त्याचा उपयोग करायचे प्रमाण वाढते, जSरा आधी हे कळले असते तर असे हळहळून सुरुवातीला क़डक पथ्य पाळणे, लवकर उठून जिम, फिरायला जाणे यापासून ते सोयीस्कर पळवाटा काढणे असा प्रवास सुरू होतो तो अगदी शेवटपर्यंत.
आपण या वरील वर्णनात कुठे बसतो का याचा विचार करा बरं. होय असे उत्तर असेल तर आजच, आत्ताच सावध होण्याची गरज आहे आणि जाणीवपूर्वक आहारात-जीवनशैलीत बदल करण्याची गरज आहे. वरील वर्णन आपल्याला अजिबात लागू नसेल तर सध्यातरी अभिनंदन कारण हे कदाचित भविष्यातही घ़डू शकते, तेव्हा सावधान!
याच वरील विचारांनी आणि अनेक रुग्ण, लांबचे-जवळचे नातेवाईक यांच्या शंका व त्यांचे निरसन करण्यासाठी, आयुर्वेद हे शास्त्र म्हणून आजही कसे शाश्वत आहे हे सांगण्यासाठी या पानाद्वारे आपल्यापर्यंत पोचायचे ठरविले. पारंपारिक जीवनशैली, विशेषतः आहाराचे महत्त्व, ते बनविण्याच्या, खाण्याच्या पद्धतीतील योग्य-वाईट बदल यांविषयीचे लेखन इथे असणार आहे. आयुर्वेद म्हणजे केवळ हे खाऊ नका-ते खाऊ नका असे नकारार्थी सांगणारे शास्त्र नाही तर ते तुम्हाला कमी अपायकारक वा जास्तीतजास्त हितकर कसे होतील हे सांगणारे शास्त्र आहे यासाठीच हा खटाटोप. जीवनशैली महत्त्वाची आहेच, त्याबद्द्ल विषयानुरूप लिहिनच.
आहारयोग
आहार म्हणजे जे जे आपल्या अन्ननलिकेवाटे पोटात जाते तो आहार. योग म्हणजे जोडले जाणे. या आहाराशी आपण कसे जो़डले जातोय त्यावर त्याचा परिणाम अवलंबून असतो.
योगाचे चार प्रकार - अयोग (पचनशक्तिपेक्षा कमी खाणे), अतियोग (पचनशक्तिपेक्षा जास्त खाणे), मिथ्यायोग (पचन विकृत करणारे वा चुकीचे खाणे) व समयोग (पचायला योग्य असे खाणे).
यातील स्वास्थ मिळ्ण्यासाठी व टिकण्यासाठी समयोग असणे हेच गरजेचे आहे व इतर योग टाळणे हेही महत्त्वाचे आहे. आपल्या प्रकृतिनुसार, वयानुसार, जीवनशैली, नोकरी / व्यवसायानुसार, जीवनांतील अवस्थांनुसार, राहाण्याचे ठिकाण व ऋतुनुसार योग्य असे अन्न-पान, योग्य वेळेला शिजवणे, योग्य वेळेला खाणे, आनंदाने खाणे इतकेच नाही तर ते नीट पचवून त्यापासून कोणताही त्रास न होता शरीरास बल, ऊर्जा मिळणे इतके साधले तरच त्या घेतलेल्या अन्न-पानाचा समयोग होय. हा समयोग जाणून घेऊया व निरोगी होण्याचा प्रयत्न करू या, निरोगी राहूया हाच 'आहारयोग' या पानाचा उद्देश.
© वैद्य तनुजा गोखले, पुणे.
tanugokhale@gmail.com
twitter handle - tanugokhale
संपर्क - 9765383735
नम्र विनंती - येथे दिली जाणारी माहिती ही आयुर्वेदानुसार योग्य आहाराविषयीची सर्वसामान्य माहिती आहे, ती प्रत्येक व्यक्तिस वा रुग्णास लागू पडेलच असे नाही. येथे वाचून आपल्या रोगावर उपाय करू नयेत वा इतरांना सुचवू नयेत. उपाय करण्यासाठी वैद्यकीय तज्न्यांचा विशेषतः आयुर्वेदीय उपचार करणाऱ्या वैद्यांचा सल्ला घ्यावा ही विनंती.

No comments:

Post a Comment

Visit Our Page