Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Monday, November 30, 2015

पुरुष वंध्यत्व – आयुर्वेदाच्या चष्म्यातून

पुरुष वंध्यत्व – आयुर्वेदाच्या चष्म्यातून




पुरुष वंध्यत्व – आयुर्वेदाच्या चष्म्यातून
गर्भधारणेसाठी ऋतु – क्षेत्र – अम्बु – बीज हे चार घटक सुयोग्य स्थितीत असणे आवश्यक आहे. ऋतु म्हणजे योग्य काळ, क्षेत्र म्हणजे ठिकाण, अंबु म्हणजे आवश्यक असे सर्व हॉर्मोन्स व बीज म्हणजे सामर्थ्यवान पुरुष व स्त्रीबीज.
हे चार घटक सर्वदृष्टीने समृद्ध आणि सामर्थ्यवान होण्यासाठी गर्भधारणेपूर्वी पुरुष व स्त्री दोघांनी पंचकर्माने शरीरशुद्धी करावी असा शास्त्रादेश आहे. दैनंदिन चयापचयातून तसेच निरनिराळ्या विद्युतचुंबकीय लहरींपासून काही विषारी घटक सतत निर्माण होत असतात. त्यांना पेशी विघातक परमाणु (फ्री रॅडिकल्स) म्हणतात. पुरुष व स्त्रीबीजांवर तसेच अम्बु म्हणजे हॉर्मोन्सचे असंतुलन फ्री रॅडिकल्समुळे होऊन त्यांचे अनिष्ट परिणाम संपूर्ण प्रजनन यंत्रणेवर होतात. परिणामी त्यांचे प्राकृत कार्य आणि सामर्थ्य खालावते. मानसिक क्लेश, ताणतणाव, वाढते प्रदूषण, फास्ट फूड मधून सेवन केले जाणारे रासायनिक प्रिझर्व्हेटिव्हज किंवा रंग, वाढते वय अशा गोष्टींचा दुष्परिणाम देखील तितकाच महत्वाचा आहे. ह्या सर्व अनिष्ट गोष्टींचा प्रतिकार करून पुरुषबीज सामर्थ्य उत्तम ठेवणे हाच ह्या लेखाचा प्रमुख उद्देश आहे.
ऋतु – ऋतु म्हणजे काळ.
पूर्णषोडशवर्षा स्त्री पूर्णविंशेन सङ्गता शुद्धे गर्भाशये मार्गे रक्ते शुक्रेऽनिले हृदि ।। अ. हृदय, सूत्रस्थान १/८
सोळा वर्ष पूर्ण झालेली शुद्ध गर्भाशय असलेली स्त्री, जिचा अपत्यमार्ग, रक्त, शुक्रवायु, हृदयातील वायु अदूषित असेल व ती वीस वर्ष पूर्ण झालेल्या निरोगी पुरुषाबरोबर मैथुन करेल तिला उत्तम वीर्यवान संतती प्राप्त होते. ह्या श्लोकात पुरुषाच्या वयाचे वर्णन स्पष्ट आहे. अर्थात पुरूषबीज ह्या वयात उत्तम व स्वास्थ्यसंपन्न असते. ह्यालाच योग्य ऋतु समजावे. ह्यापेक्षा लहान वयात शुक्रबीज अविकसित असतात व वय जसजसे वाढत जाते तसतसे त्याची क्षमता कमी होऊ लागते.
क्षेत्र – शुक्रनिर्मिती आणि वहन करणारी संपूर्ण यंत्रणा म्हणजे क्षेत्र. शुद्ध शुक्र निर्मिती होण्यासाठी ही सर्व यंत्रणा सुस्थितीत आणि कार्यक्षम असणे जरुरीचे आहे. ही क्षेत्ररचना सकस राहण्यासाठी आहार, पंचकर्म चिकित्सा आणि औषधी चिकित्सा फलदायी ठरते. पुढे हा विषय विस्ताराने मांडला आहे.
अम्बु – ह्याठिकाणी शुक्राणुंसाठी खतपाणी म्हणजे अम्बु. बीजातून रोपटे व पुढे वृक्ष स्वरूप प्राप्त होण्यासाठी खतपाणी आवश्यक आहे. समृद्ध शुक्रधातुसाठी सुयोग्य हॉर्मोन्स (संप्रेरके) असा अर्थ येथे अभिप्रेत आहे. एफ. एस. एच.; एल, एच, टेस्टोस्टेरॉन ह्या संप्रेरकांचा असमतोल असल्यास औषधांच्या सहाय्याने सुधारता येतो.
बीज – बीज म्हणजे शुक्राणु. गर्भधारणा यशस्वी होण्यासाठी शुक्राणूंची संख्या किमान २० दशलक्ष असणे आवश्यक आहे. ह्यापैकी फक्त एकच शुक्राणु गर्भधारणा होण्यास पात्र ठरतो तरीदेखील ही संख्या कमी असून चालत नाही. ह्या शुक्राणूंना विशिष्ट गती असावी लागते. ह्या गतीला मोटिलिटी म्हणतात. हा शुक्राणु गर्भाशयात प्रवेश करून पुढे बीजवाहिनीच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचतो. एकूण शुक्राणूंपैकी कमीतकमी ३० % शुक्राणुंनी आपली विशिष्ट गती किमान एक तास टिकवून ठेवण्याची गरज असते.
       शुक्राणूंच्या रचनात्मक दोषांमुळे वंध्यत्व आणि बीजदोषजन्य विकृती उत्पन्न होऊ शकतात. ह्याला मॉर्फलॉजिकल दोष म्हणतात. ह्यात पेशीतील डी. एन. ए. ची स्थिती बिघडलेली असते. त्यामुळे बीजदोषजन्य अनुवांशिक व्याधी उत्पन्न होतात. ह्यांना म्युटेजेनिक डिसऑर्डर्स म्हणतात. पंचकर्म व विशिष्ट औषधोपचारांनी ह्यावर मात करता येऊ शकते. परंतु हा विषय मोठ्या संशोधनाचा आहे. सध्या फक्त शास्त्राधारित सूत्रांच्या आधारे गृहीतकांच्या (Hypothetical) स्वरुपात हा विषय मांडता येतो.
      प्राकृत शुक्रधातूचे मापन किमान २ मिली असावे. त्यात फ्रुक्टोजची मात्रा ३ मिलीग्राम प्रति मिली असावी. वीर्य द्रावित होण्याचा काळ २० मिनिटांपेक्षा कमी असू नये. ह्या सर्व गोष्टी वीर्य तपासणी करून समजू शकतात. काही चिह्ने व रुग्ण सांगतो त्या लक्षणांद्वारे इलाज करणे वंध्यत्वाच्या दृष्टीने आवश्यक ठरते. स्वप्नावस्था, शीघ्रपतन, मैथुनेच्छा न होणे, लिंगाला आवश्यक असलेला ताठरपणा प्राप्त न होणे अशा ह्या समस्या आहेत.
वरील सर्व लक्षणांची सविस्तर माहिती घेऊन आवश्यक त्या दोषावर सुयोग्य उपचार करून पुरुष वंध्यत्वाचा इलाज करता येतो.
      वृषणकोषात (Scrotum) दोन वृषणग्रंथी (Testicles) असतात. ह्या ग्रंथींमध्ये शुक्राणूंची उत्पत्ती होते. पुढे सेमिनल व्हेसिकल्स नावाच्या कोषिका असतात, त्यातून वीर्याची उत्पत्ती होते. पौरुष ग्रंथींमधून (Prostate gland) चिकटसर द्रव ह्यात मिसळला जाऊन शुक्र धातु समृद्ध होतो. मेंदूतील विशिष्ट यंत्रणा उत्तेजित झाल्याने शुक्रवाहिन्यांच्या मार्गाने शुक्राणु व वीर्याचे हे मिश्रण शिस्नातून बाहेर टाकले जाते.
      पुरुष वंध्यत्व चिकित्सा करतांना सर्वप्रथम वीर्य तपासणी केली जाते. ह्या तपासणीत शुक्राणूंची संख्या कमी असल्याचे निदर्शनास आल्यावर त्याची चिकित्सा करावी लागते. ह्यासाठी अश्वगंधा, शतावरी, कवचबीज, गोक्षुर, तालिमखाना, विदारीकंद सारख्या वनस्पतींचा उपयोग होतो. ह्या वनस्पतीच्या सेवनाने शुक्राणूंची संख्या वाढते खरी परंतु हे शुक्राणु वीर्य स्खलनाच्या वेळी पुरेशा प्रमाणात बाहेर पडत नाहीत असे अनेक वेळा लक्षात येते. त्याची कारणे समजून उपचार करणे आवश्यक आहे.
      शुक्राणूंची उत्पत्ती झाल्यावर शुक्रवाहिन्यांच्या मार्गाने वीर्य शिस्नापर्यंत येते. ह्या मार्गात काही अडथळा आला तर शुक्राणूंची कमतरता दिसून येते. आतड्यातील अपान वायु, मळाचे खडे हे त्या भागातील रक्तवाहिन्यांवर व शुक्रवाहिन्यांवर दाब निर्माण करू शकतात. हा दाब नाहीसा करण्यासाठी बस्ति चिकित्सा महत्वाची ठरते. बस्ति चिकित्सेने अपानाचे कार्यही सुरळीत होते.
अपानोऽपानगः श्रोणिवस्तिमेढ्रोरुगोचरः । शुक्रार्तवशकृन्मूत्रगर्भनिष्क्रमणक्रियः ।। अष्टांगहृदय, सूत्रस्थान १२/९)
अपानवायु गुदस्थानी रहात असून कटि, शिस्न व मांड्या ह्या ठिकाणी संचार करतो. तो शुक्र, आर्तव, मल, मूत्र व गर्भ ह्यांना योग्य काळी शरीराबाहेर काढण्याचे कार्य करतो. त्यामुळे शुक्र धातूची चिकित्सा करतांना अपानवायूचा विचार महत्वाचा आहे.
अपानवायु कशाने बिघडतो ?
अपानो रूक्षगुर्वन्नवेगाघातातिवाहनैः । यानयानासनस्थानचङ्क्रमैश्चातिसेवितैः ।।
कुपितः कुरुते रोगान्कृच्छ्रान्पक्वाशयाश्रयान् । मूत्रशुक्रप्रदोषार्शोगुदभ्रंशादिकान्बहून् ।। अ. हृदय, निदानस्थान १६/२७-२८
   रूक्ष व गुरु अन्न सेवन, वेगांचा अवरोध, अतिशय कुंथणे, गाडीघोड्यावरून प्रवास करणे, फक्त बैठे काम करणे, सतत उभे राहणे, बेसुमार चालणे अशा कारणांमुळे अपानवायु कुपित होतो. ह्याने पक्वाशयाच्या आश्रयाने होणारे मूत्राघात, प्रमेह, शुक्रदोष, मूळव्याध, गुदभ्रंश सारखे कष्टसाध्य व्याधी उत्पन्न होतात.
     ग्रंथात वर्णन केलेल्या ह्या कारणांव्यतिरिक्त काळानुसार इतर कारणांचाही विचार करणे आवश्यक आहे. जसे – अति प्रमाणात मैद्याचे पदार्थ सेवन करणे, कार्बोनेटेड शीतपेयांचे बेसुमार सेवन, कंबरेचा पट्टा (बेल्ट) फार घट्ट बांधणे, अतिप्रमाणात मांसाहार करणे, घाई घाईने (न चावता) जेवण करणे, मोड आलेल्या कडधान्यांचे अधिक सेवन करणे, अकाली झोप घेणे व रात्र-रात्र न झोपणे (शिफ्ट ड्युटीज, रात्रीचे ड्रायव्हिंग मुळे) अशी अनेक कारणे अपानवायु बिघडवतात. मैद्यामुळे पाचक स्रावांना पचनयंत्रणेत येण्यास अडथळा होतो, शीतपेयांमुळे पाचकस्रावांची शक्ती कमी होते, कंबरेचा पट्टा कसून बांधण्यामुळे आतड्यांची चलनवलन गती मंदावते, मांसाहार पचण्यास जड असल्याने पाचकस्रावांना पचनास पुरेसा वाव मिळत नाही, घाईने जेवतांना अन्नाबरोबर भरपूर प्रमाणात हवा अन्नमार्गात घेतली जाते, कडधान्य पचनयंत्रणेत जाऊन आंबतात व फसफसतात, जागरणाने शरीराचे बायोलोजिकल क्लॉक बिघडते. म्हणून अपानाचे संतुलन राखण्यासाठी ह्या सर्व गोष्टींचा विचारपूर्वक वापर करावा, कोणत्याही प्रकारचा अतिरेक होत नाही ह्याची खात्री करावी.
शुक्रावृतेऽति-वेगो वा न वा निष्फलता ऽपि वा ॥ अ. हृदय, निदानस्थान १६/३८
   अपानवायुचे शुक्रधातुला आवरण झाल्यास शुक्राचा अतिशय वेग येतो किंवा अजिबात येत नाही, त्याने गर्भोत्पत्ती होत नाही.
कुपित वायूची लक्षणे . . .
स्रंसव्यासव्यधस्वाप-साद-रुक्-तोद-भेदनम् ॥ सङ्गाङ्ग-भङ्ग-संकोच-वर्त-हर्षण-तर्षणम् ।
कम्प-पारुष्य-सौषिर्य-शोष-स्पन्दन-वेष्टनम् ॥ स्तम्भः कषायरसता वर्णःश्यावोsरुणोsपि वा ।
. . . . अष्टांगहृदय, सूत्रस्थान १२/४९
   स्रंस म्हणजे अवयव आपल्या नैसर्गिक स्थानापासून खाली सरकणे, व्यास म्हणजे आकारमान वाढणे, व्यध – इजा होणे, स्वाप – निश्चल होणे, रुक् – रुजा किंवा वेदना होणे, तोद – टोचल्याप्रमाणे दुखणे, भेदन – आरपार छिद्र होणे, संग होणे म्हणजे दोष साठणे, अंगभंग – विकलांगत्व येणे, संकोच – आकुंचन पावणे, वर्त – उलटणे किंवा चुकीच्या दिशेला वळणे, हर्षण – रोमांच, तर्षण – तहान लागणे, कम्प – थरथरणे, पारुष्य – कर्कशपणा, सौषिर्य – भेगा पडणे, शोष – कोरडेपणा, स्पंदन – केंद्रित स्वरूपाच्या हालचाली होणे, वेष्टन – लेप केल्याप्रमाणे संवेदना होणे, स्तम्भ – निश्चल होणे, कषायरसता – तोंडास तुरट चव येणे, वर्णःश्यावोsरुणोsपि – काळपट किंवा सूर्याप्रमाणे तांबडा वर्ण येणे.
    पुरुष वन्ध्यतेबद्दल विचार करतांना ह्या प्रत्येक संज्ञेचा सखोल विचार अपानवायुच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. त्याकरिता पुरुष लैंगिक अवयव व पुरुषबीज ह्यातील दोषांसाठी बस्ति चिकित्सेचा नितांत उपयोग होतो हे ध्यानात ठेवावे.
    अपानवायुचा संबंध मानसिक स्वास्थ्याशी निगडीत आहे. “भीतीने गर्भगळीत होणे” ही जुनी म्हण आहे. मानसिक संतुलन बरोबर असेल तर गर्भ स्थिर राहतो व बिघडल्यास तो गर्भपात घडवतो. स्वास्थ्यपूर्ण गर्भाधान होण्यासाठी पुरुषांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम असणे महत्वाचे आहे. भीती, चिंता, क्रोध, मानसिक दडपण असतांना पुरुषांचे लैंगिक अवयव कार्यक्षम राहू शकत नाहीत. अशा अवस्थेत निरोगी व सत्ववान गर्भाधान होणे शक्य नसते. औषधी चिकित्सा करतेवेळी हा मुद्दाही लक्षात घेणे गरजेचे आहे.
    थोडक्यात पंचकर्मांपैकी किमान विरेचन, नस्य आणि बस्ति चिकित्सेचा प्रयोग करावा. बीजदोष नाहीसे करण्यासाठी, बीज सामर्थ्यवान होण्यासाठी व उत्तम गर्भधारणा होण्यासाठी ह्या क्रिया आवश्यक आहेत.
आता आहाराबद्दल बघूया
सौम्यं स्निग्धं गुरु शुक्लं मधुगन्धि मधुरं पिच्छिलं बहु बहलं घृततैलक्षौद्रान्यतमवर्णं च शुक्रं गर्भाधानयोग्यं भवति॥ . . . . अष्टाङ्गसङ्ग्रहः, शारीरं स्थानम् १ / ४
शुक्र धातूचे वर्णन – सौम्य, स्निग्ध, शुक्ल वर्ण, मधाप्रमाणे गंध असणारे, मधुर, पिच्छिल, बहु, बहल, घृत, तैल, क्षौद्र (मधाप्रमाणे) दिसणारे असे शुक्र गर्भाधानास योग्य असते. आयुर्वेदाच्या “सामान्य – विशेष” सिद्धांतानुसार शुक्रधातुच्या समान असणारे गुण त्याच्या पोषणास उपयुक्त ठरतात. विरुद्ध गुणांच्या पदार्थ सेवनाने शुक्रक्षय होतो. आहारातील घटकांचा विचार केल्यास दूध, तूप, मधुर रसाचे पदार्थ हे शुक्र धातुच्या पोषणासाठी लाभदायक होतात.
सौम्य – सोम म्हणजे चंद्र ही ह्या शब्दची व्युत्पत्ती. चंद्राप्रमाणे शीतल (ज्यामध्ये आग्नेय गुणाचा अभाव आहे). शीतल गुणांमुळे शुक्रधातूची वाढ होणे अभिप्रेत आहे. वृषणकोशाची निर्मिती करतांना निसर्गाने ह्याला शरीराबाहेर टांगलेल्या अशा स्थितीत रचले ज्यामुळे त्याला हवेशीर वातावरण मिळेल व उष्णता किंवा ऊब तुलनेने कमी मिळेल. मानवी शरीराचे सर्वसाधारण तापमान ३७० सेंटीग्रेड किंवा ९८.६०० फॅरनहाईट्स इतके असते. एवढ्या तापमानात शुक्रबीज जास्त काळ टिकत नाहीत. ४० सेंटीग्रेड इतक्या थंड तापमानात ठेवल्यास शुक्रबीज टिकतात परंतु त्यांचे चलनवलन स्तब्ध होते. २०० सेंटिग्रेड तापमानात शुक्रबीज सर्वात जास्त काळ टिकतात व चलनवलनही अबाधित राहते. म्हणून शुक्रधातुच्या रक्षणासाठी व वाढीसाठी तापमान कमी असणे आवश्यक आहे.
स्निग्ध: शुक्रधातु व वीर्य ह्या दोन गोष्टी निराळ्या आहेत. शुक्रधातु म्हणजे प्रत्यक्ष शुक्रबीज तर वीर्य म्हणजे ज्या द्रवामध्ये ह्या बीजांचे पोषण होते तो द्रव. स्निग्धता असल्याने शुक्रबीजांचे सुयोग्य पोषण होते. रुक्षतेमुळे बीजांचे कुपोषण होण्याची शक्यता असते. शुक्रधातूचे वहन, चलनवलन उत्तम राहण्यासाठी ह्या ‘स्निग्ध’ गुणाचा उपयोग होतो.
गुरु : गुरु म्हणजे जड. पंचमहाभूतांतील पृथ्वी आणि जल महाभुते फक्त गुरु आहेत व ह्यांच्या संयोगाने मधुर रस तयार होतो. शुक्रधातु मधुर असल्याने त्यात स्वाभाविकपणे पृथ्वी आणि जल महाभूतांचे प्राधान्य असते. मधुर रसाने त्याची वृद्धी होते असा अर्थ ध्यानात येतो. पण प्रत्यक्षात मात्र मधुमेही रुग्णांमध्ये शुक्रक्षीणता आढळते हे कसे? हे कोडे उलगडण्यासाठी शारीरक्रियेचा पाया लक्षात घेणे आवश्यक आहे. मधुमेहात रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. त्याचे परिणमन धातु पोषणासाठी होत नाही. इन्सुलिनला धात्वग्नि समजावे. म्हणजे ह्याठिकाणी धात्वग्नि दुर्बल झाल्याने रस-रक्तातील पोषक घटक पुढील धातूंपर्यंत पोचत नाहीत अर्थात त्यामुळे शुक्र दौर्बल्य निर्माण होते.
शुक्लवर्ण : शुक्रधातु उत्तम असेल तर त्याचा वर्ण शुक्ल म्हणजे स्वच्छ पांढरा असतो. इतर कोणत्याही धातूच्या मलीनतेमुळे काही दोष निर्माण झाला तर वर्ण बदलतो. कफाचा वर्ण शुक्ल आहे व शुक्रधातुशी त्याचे साधर्म्य आहे. सामान्यतः कफ वर्धक आहार विहाराने शुक्रवृद्धी होते.
सर्वसामान्य लैंगिक समस्यांबद्दल काही खुलासा
स्वप्नावस्था – झोपेत नकळतपणे वीर्यस्खलन होणे म्हणजे स्वप्नावस्था. “मनी वसे ते स्वप्नी दिसे” ही म्हण ह्या समस्येशी निगडीत आहे. मनात सतत लैंगिक विचार असले तर त्याची परिणीती स्वप्नातही होते. मेंदूतील हायपोथॅलॅमसद्वारा संप्रेरकांमध्ये तसे बदल होतात आणि स्वप्नावस्था निर्माण होते.
हस्तमैथुन – हस्तमैथुन म्हणजे मैथुनावस्थेचे काल्पनिक चित्र रचून हाताने शिस्नपीडन करून वीर्यपात घडविणे. सातत्याने लैंगिक विचार केल्याने मनावर कामवेग आरूढ होतो व त्यातून ही क्रिया करण्याची इच्छा निर्माण होते. हस्तमैथुन केल्याने लिंग लहान होते, वीर्य पातळ होते, वंध्यत्व येते असे अनेक गैरसमज समाजात चर्चिले जातात. हे निव्वळ गैरसमज असल्याने मनात कोणतीही अशी भीती बाळगू नये. परंतु “अति सर्वत्र वर्जयेत्” हा नियम लक्षात ठेवावा.
    स्वप्नावस्था किंवा हस्तमैथुन ह्या दोन्ही अवस्था मानसिक दोषांमुळे व चुकीच्या आहारामुळे उत्पन्न होऊ शकतात. रज व तम ह्या दोन प्रकारच्या मानसिक दोषांच्या प्रभावाने, त्याचबरोबर मद्यपान, अमलीपदार्थ सेवन, अति मांसाहार, तामसी अन्न अशा कारणांमुळे ह्या अवस्था निर्माण होतात. सात्विक चिंतन, मनन, अभ्यास, वाचन, सुविचार अशा साध्या सोप्या गोष्टींचा अंगिकार व सुयोग्य संतुलित आहार केल्याने ह्या समस्यांपासून चार हात लांब राहणे शक्य आहे.
वीर्य पातळ होणे – हस्तमैथुन किंवा स्वप्नावस्था दीर्घकाळ राहिल्याने “वीर्य पातळ झाले” असी तक्रार अनेक रुग्ण करतात. हे म्हणणे चुकीचे आहे. अशा कारणांमुळे वीर्य पातळ होत नाही किंवा वंध्यत्व येत नाही. हा गैरसमज डोक्यातून काढून टाकावा. ह्यामुळे मानसिक असंतुलन मात्र वाढते आणि “आपण काहीतरी चुकीच्या कृत्यामुळे मोठ्या रोगाला बळी पडलो” अशी भीती वंध्यत्वाला कारणीभूत होते. वीर्य पातळ असो की घट्ट, त्यातील शुक्रबीजांची संख्या, चलनवळण गती, फ्रुक्टोजची पातळी हीच प्रजननक्षमतेला जबाबदार असते.
लिंग उत्थान समस्या – कुपित अपानवायु, मानसिक क्लेश आणि अपुरा रक्तसंचार ही तीन प्रमुख कारणे लिंग उत्थान समस्येशी निगडीत आहेत. नळाला रबरी पाईप जोडून पाणी जोरात सुरु केल्यावर पाईप ताठ होतो. लिंग उत्थान क्रिया नेमकी अशीच होते. पाईप वर बाहेरून दाब पडला किंवा त्यातील रक्त संचारात काही अडथळा आला तर रक्तसंचार खंडित होतो व उत्थान क्रिया बंद पडते किंवा कमी होते. आतड्यांमध्ये माळाचे खडे किंवा गॅस भरल्यामुळे शिस्नाच्या खालच्या बाजूला असलेल्या रक्तवाहिन्यांवर दाब पडतो व रक्तसंचार मंदावतो. ३० एम.एम.एच.जी. एवढा रक्तदाब लिंग सुप्तावस्थेत असतांना राहतो. लिंग पीडनाने हा दाब ९० ते १०० एम.एम.एच.जी. एवढा वाढतो. उत्तेजक शब्द, स्पर्श, रुप, रस व गंध अशा कारणांमुळे केंद्रीय मज्जा यंत्रणा उत्तेजित होऊन हा रक्तसंचार वाढविते.
     मानसिक क्लेशनिवारक औषधे, बस्ति चिकित्सा, रक्तसंचार संतुलित करणारी औषधे योग्य सल्ल्याने घेतल्यावर उत्थान क्रिया सुरळीत होऊन उत्थान प्राकृत होते. ह्यात वयाची मर्यादाही महत्वाची आहे. तरुण वयात ज्याप्रकारे उत्थान होते तेढ्या प्रमाणात उत्थान होण्याची अपेक्षा वय वाढल्यानंतर करणे नक्कीच चुकीचे आहे. मधुमेही, स्थौल्य व उच्च रक्तदाबाचे रुग्ण ह्यांच्या समस्या निराळ्या असतात. प्रकृती, आहार, वय, रोगावस्था अशा गोष्टींचा विचार करून चिकित्सा करावी लागते.
प्रजांकुर व अश्वमाह – शुक्रबीज निर्मिती, स्वास्थ्य व गर्भस्थापनेसाठी दोन परिपूर्ण पाठ
गेल्या २५ वर्षांपासून अक्षय उद्योग समूह आयुर्वेद व आरोग्य क्षेत्रात विक्रमी वाटचाल करीत आहे. वनौषधींची लागवड, आयुर्वेदीय औषधांची निर्मिती, विपणन, आरोग्यविषयक पुस्तकांचे प्रकाशन, संशोधन व विकास अशा अनेक लोकोत्तर कार्यात मनाचे स्थान मिळविले आहे. वैद्यकीय, औषधनिर्मिती शास्त्र, कायदा, अर्थकारण अशा विविध क्षेत्रातील व्यासंगी तज्ञ ह्या उपक्रमात सहभागी आहेत.
     पुरुष वंध्यत्व निवारणार्थ विविध शारीरिक व मानसिक भावांचा विचार करीत, औषधी घटकांचा सखोल अभ्यास करून पुरुषबीज समृद्धीसाठी अक्षय उद्योग समूहाने ‘प्रजांकुर नस्य’ व ‘अश्वमाह’ नावाची दोन अभिनव उत्पादने सादर केली आहेत. ह्यातील प्रत्येक औषधी द्रव्याच्या कार्मुकतेबद्दल आधुनिक वैद्यक शास्त्रात उपलब्ध झालेल्या संशोधनाचे सारांश स्वरुपात संदर्भ देऊन विषयाला परिपूर्णता दिली आहे.
प्रजांकुर नस्य चिकित्सा - विश्लेषण:
      मानवी शरीरात टेस्टोस्टेरॉन नामक संप्रेरक (हॉर्मोन) उत्पन्न होते. हे मुख्यतः वृषणकोषातून व अल्प प्रमाणात स्त्रियांच्या बीजकोशातून स्रावित होते. थोड्या प्रमाणात अॅड्रिनल ग्रंथीमधूनही ह्याची निर्मिती होते. हे एक धातुपोषक असे संप्रेरक आहे.
पुरुषांमध्ये प्रजनन यंत्रणा, वृषणग्रंथी, पौरुष ग्रंथी, मांसपोषण, अस्थिपोषण, जांघेतील ब खाकेतील केस, दाढी-मिशा ह्या सर्व बदलांमध्ये टेस्टोस्टेरॉन महत्वाची भूमिका बजावते. ह्याशिवाय अस्थिधातूचा ठिसूळपणा (ऑस्टिओपोरोसिस) काबूत ठेवण्यास हे हॉर्मोन समर्थ आहे.
     पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण स्त्रियांपेक्षा ७ ते ८ पट अधिक असते. पुरुषांमध्ये चयापचयात त्याचा अधिक वापर होत असल्याने निर्मितीची क्षमता सुमारे २० पट अधिक अशी निसर्गाने प्रदान केली आहे. ह्याची निर्मिती पियुशिका (पिट्युटरी) ग्रंथीच्या अधिपत्याखाली होते. ह्यातून फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन (FSH) व ल्युटिनायझिंग हॉर्मोन (LH) अशी दोन संप्रेरके उत्पन्न होतात. ल्युटिनायझिंग हॉर्मोनमुळे टेस्टोस्टेरॉन निर्मितीस प्रेरणा मिळते तर दोहोंच्या एकत्रित प्रभावाने शुक्रबीज निर्मिती होते.
      पुरुष वंध्यत्वाची चिकित्सा करतांना पियुशिका ग्रंथी आणि वृषणग्रंथी अशा दोन्ही स्तरांवर विचार करणे आवश्यक आहे. वृषणग्रंथी दोषांमध्ये गालगुंड (Mumps), व्हेरिकोसील, अनडिसेंडेड टेस्टीज, वृषणग्रंथी शोथ, हायड्रोसील, इपिडायडेमिस (शुक्रवहन नलिका) शोथ अशा विकारांचा समावेश होतो. त्यानुसार त्या त्या विकाराची चिकित्सा करावी लागते. पियुशिका ग्रंथीमध्ये दोष असेल तर त्याची चिकित्सा ‘नस्य’ रूपाने करता येते. रुग्णाच्या रक्ततपासणीतून टेस्टोस्टेरॉन मापन करता येते. ह्याची किमान पातळी ३०० ते १००० नॅनोग्राम प्रति डेसिलिटर एवढी असणे आवश्यक आहे. ही पातळी कमी असल्याचे आढळले तर पियुशिका ग्रंथीच्या चाचण्या करणे आवश्यक ठरते. ह्यातून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे पियुशिका ग्रंथीच्या प्रभावाखाली सर्व प्रजनन यंत्रणा केंद्रित असते. म्हणूनच आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून नस्याचा उपयोग प्रजनन यंत्रणेवर हमखास लाभदायक ठरेल असा निष्कर्ष काढता येतो.
      आधुनिक वैद्यक शास्त्रात टेस्टोस्टेरॉनची जेल स्वरुपात नासामार्गे चिकित्सालयीन चाचणी (Clinical Trial) घेण्यात आली. ह्या चाचणीत ३०६ रुग्णांवर ह्याचा प्रयोग केला. ३०० नॅनोग्राम प्रति डेसिलिटरपेक्षा कमी असलेल्या रुग्णांवर ३ महिने रोज २ वेळा हे द्रव्य नस्य स्वरुपात प्रविष्ट करून त्यांच्या टेस्टोस्टेरॉन पातळीचे मापन केले असता ९०% रुग्णांची टेस्टोस्टेरॉन पातळी विहित प्रमाणात वाढली. ह्यावरून गर्भस्थापनेत नस्याचे महत्व सिद्ध होते.
       वंध्यत्व व गर्भस्थापनेत नस्याची अशी उपयुक्तता आयुर्वेदाने हजारो वर्षांपूर्वी जाणली व उपयुक्त वनस्पतींचे पाठ ग्रंथात विषद केले आहेत. त्यांना नव्याने अभ्यासून व शास्त्राच्या चौकटीत बसवून “प्रजांकुर नस्य” म्हणून अक्षय उद्योग समूहाने सादर केले आहे.
     चरक संहिता ह्या आद्य ग्रंथात महर्षी चरकाचार्यांनी काही विशिष्ट वनस्पतींचे वर्गीकरण गर्भस्थापक औषधी म्हणून केले आहे. ह्याचे समर्थन कश्यप संहिता, सुश्रुत संहिता अशा ग्रंथातही नमूद आहे. औषधी गर्भसंस्कारांचा आधार ग्रंथ “अष्टांगहृदय” ह्यामध्ये महर्षी वाग्भट ह्यांनी देखील त्याचे समर्थन करून औषध सेवनाचे विविध मार्ग व स्वरूप सांगितले आहे.
ऐन्द्रीब्राह्मीशतवीर्यासहस्रवीर्याsमोघाsव्यथाशिवाsरिष्टावाट्यपुष्पीविष्वक्सेनकान्ता इति दाशेमानि प्रजास्थापनानि भवन्ति l . . . . . . . चरक, सूत्रस्थान ४/१८ (४९)
लक्ष्मणादिनस्यदानं गर्भस्थापनार्थं, स्थितगर्भायाश्चमासत्रयाल्पान्तरे पुत्रापत्यजननार्थं नस्यदानमिति ll . . . . . . . सुश्रुत, शारीर २-३२
चरक संहिता वर्णित वनस्पतींचा सुयोग्य वापर करून अक्षय फार्मा रेमेडीजने सिद्ध घृत स्वरुपात “प्रजांकुर” नावाने सादर केले आहे. ह्याचा वापर नस्य स्वरुपात गर्भधारणेच्या संकल्पापासून गर्भधारणा निश्चिती पर्यंत करावयाचा आहे.
नस्याचे लाभ
ऐन्द्रीब्राह्मीशतवीर्यासहस्रवीर्याऽमोघाऽव्यथाशिवाऽरिष्टावाट्यपुष्पीविष्वक्सेनकान्ता इति दशेमानि प्रजास्थापनानि भवन्ति ।। . . . . सूत्रस्थान चरक ४/१८ (४९)
ततः प्रजास्थापनाख्या दशौषधीः शिरसा दक्षिणेन च पाणिना धारयेत्। एताभिश्च सिद्धं पयो घृतं वा पिबेत्। . . . . . अष्टांगसंग्रह शारीर १ – ६२
    “पिण्यासाठी व शिरोभागी धारण करण्यासाठी” सदर पाठाचा वापर करावा असा शास्त्रादेश आहे. शिरोभागी धारण करणे म्हणजेच ‘नस्य स्वरुपात वापर करणे’ असा अर्थ येथे शास्त्रकारांना अभिप्रेत आहे. “नासाहि शिरसो द्वारं” ह्या प्रस्थापित संकल्पनेनुसार व आधुनिक वैद्यकानुसारही नस्य हे प्रजनन संस्थेवर उत्तम कार्य करते. म्हणून ‘प्रजांकुर घृत’ नस्य रूपानेही प्रभावी ठरते. शास्त्राधार व आप्तवचन ह्या दोन्ही दृष्टिकोनातून ह्याचा वापर नस्य स्वरुपात करणे योग्यच आहे. काही द्रव्यांचे शोषण नाकाच्या मार्गाने त्वरित होते. हीच द्रव्ये पोटात घेतल्याने त्यावर अनेक पाचक स्रावांची क्रिया घडते व ‘ब्लड ब्रेन बॅरियर’ यंत्रणेमुळे कार्यकारी घटकांचे शोषण शिरोभागात होण्यास अडथळे निर्माण होतात. नाकाच्या श्लेष्मल स्तरातून ही द्रव्ये मेंदूच्या संपर्कात येतात व रसरक्तातही त्यांचे शोषण त्वरित होते. सुमारे १५ ते ३० मिनिटांत नाकातून प्रविष्ट केलेले द्रव्य रक्तसंवहनात पसरते असे सिद्ध झाले आहे. इंजेक्शन द्वारा दिल्या गेलेल्या औषधाइतक्याच कमी वेळात ह्याचा परिणाम होतो असे संदर्भही मिळतात.
घृत हेच माध्यम का ?
      नस्य द्रव्यांमध्ये चूर्ण वापरल्यास नाकाच्या श्लेष्मल त्वचेत व्यवस्थितपणे पसरले जात नाही म्हणून नस्य द्रव्य द्रव स्वरुपात असावे. द्रव पदार्थांमध्ये जल आणि स्नेह असे दोन मुख्य प्रकार आहेत. त्यापैकी स्नेह (स्निग्ध द्रव्य) हे स्वभावतः मध्यवर्ती मज्जासंस्थेला सात्म्य आहे. आयुर्वेदानुसार घृत, तैल, वसा, मज्जा हे ४ स्निग्ध पदार्थ आहेत. ह्यापैकी ‘सामान्य-विशेष’ सिद्धांतानुसार ‘मज्जा’ हा स्निग्ध पदार्थ मध्यवर्ती मज्जासंस्थेला (CNS) नक्कीच अधिक पोषक ठरेल ह्यात शंका नाही. परंतु उपलब्धी, प्राणिज स्रोत व मनुष्याच्या मानसिकतेचा विचार करून “घृत” हेच माध्यम वापरणे योग्य ठरते.
प्रत्येक १० ग्रॅम प्रजांकुर घृतामधील घटकद्रव्ये व प्रमाण: 
ऐन्द्री (Citrullus colocynthis), दुर्वा (Cynodon dactylon), अमोघा (Sterospermum suaveolens), विश्वक्सेना (Callicarpa macrophylla), अव्यथा (Hibiscus mutabilis), शिवा (Terminalia chubula), ब्राह्मी (Bacopa monnieri), वाट्यपुष्पी (Sida cordifolia), शतवीर्या (Asparagus racemosus), बहुपाद (Ficus benghalensis) प्रत्येकी २५० मिलिग्रॅम; गो घृत १० ग्रॅम; गो दुग्ध ४० ग्रॅम
      वापरण्याची पद्धत (पुरुष व स्त्रियांसाठी) : प्रथम बाटली गरम पाण्यात ठेऊन प्रजांकुर (घृत) पातळ करावे. आडवे झोपून ६ - ६ थेंब दोन्ही नाकपुड्यांत पहाटे सूर्योदयापूर्वी किंवा सूर्योदयाच्या वेळी टाकावे. २ - ३ मिनिटे तसेच पडून राहावे. गर्भधारणेच्या संकल्पापासून गर्भनिश्चिती पर्यंत हे नस्य करावे.
अश्वमाह वटी – चिकित्सा विश्लेषण :
       "अश्वमाह" हे सात औषधांचे सुरेख मिश्रण आहे. बऱ्याच शुक्रवर्धक व शुक्रस्तंभक औषधी पाठांचे वर्णन करतांना 'अश्व' हा शब्द 'शक्तीच्या संदर्भात' वापरला असतो किंवा त्या औषधाच्या माहिती पत्रकात चक्क घोड्याचे चित्र असते. "अश्वमाह" मध्ये "अश्वगंधा" ही प्रधान व अत्यंत गुणकारी वनस्पती अग्रक्रमांकाने वापरली असल्यामुळे ह्या पाठाला 'अश्वमाह' नाव दिले आहे. हा पाठ रसायन, वाजीकरण, शुक्रप्रवर्तक, शुक्रवर्धक, शुक्रस्तंभक, शुक्रदोष नाशक तसेच, शुक्रबीज संख्या, वीर्याचे प्रमाण व मैथुनशक्ती वाढवणारा अशा गुणांनी परिपूर्ण आहे.
    अश्वगंधा (Withania somnifera) : मानसिक ताण-तणावामुळे कॉर्टिसॉल नामक हॉर्मोन वाढून मेंदूवर विपरीत परिणाम होतो व शुक्रधातु निर्मिती रोडावू लागते. मेंदूतील पिट्युटरी किंवा सुप्रारीनल ग्रन्थिच्या विकारामुळे हा रोग होतो. अश्वगंधामुळे रक्तातील कॉर्टिसॉलचे प्रमाण नियंत्रणात राहते. कॉर्टिसॉल वाढल्यामुळे होणारे इतर दुष्परिणामही ह्याने कमी होतात. शिवाय रोडावलेली शुक्राणूंची संख्या वाढते. हिच्या सेवनाने विद्युत-चुंबकीय लहरींमुळे होणारे दुष्परिणाम देखील लक्षणीय मात्रेत कमी होतात व अपेक्षित परिणामात वाढ होते.
    आत्मगुप्ता (Mucuna pruriens) : आत्मगुप्ता आपल्या पेशीरक्षक गुणांमुळे शुक्राणूंची संख्या व चलन-वलन गती वाढवते त्याचबरोबर रक्तातली शर्करा पातळी शरीराला आवश्यक तेवढ्या नैसर्गिक पातळीत आणते.
    श्वदंष्ट्रा (Tribulus terrestris) : श्वदंष्ट्रा सेवनाने ६० दिवसांमध्ये क्षीणशुक्र म्हणजेच ऑलिगोस्पर्मिया नाहीसा होऊन शुक्रबीज संख्येत ७८.११ % वाढ होते.
    नारायणी (Asparagus racemosus) : वाजीकर गुणांच्या दृष्टीने Sildenafil citrate हे औषध जगप्रसिध्द आहे. परंतु त्याचे दुष्परिणामही तेवढेच लक्षणीय आहेत. नारायणी ही उत्तम वाजीकर असून पूर्णपणे निर्दोष अशी वनस्पती आहे. Sildenafil citrate व नारायणी ह्यांच्या तुलनात्मक संशोधनातून हा निष्कर्ष प्राप्त झाला. थोडक्यात नारायणी वाजीकर गुणांनी परिपूर्ण वनस्पती आहे. हिच्या सेवनाने विद्युत-चुंबकीय लहरींमुळे यकृतावर होणारा दुष्परिणाम टाळता येतो. पेश्यांतर्गत मायटोकॉन्ड्रिया वर कार्य होऊन हे संरक्षण प्राप्त होते.
    कोकिलाक्ष (Hygrophila spinosa) : वाजीकरण आणि शुक्राणुवर्धन ह्या दोन्ही मध्ये श्रेष्ठ अशी ही वनस्पती आहे. अनापत्यता, लैंगिक दुर्बलता, शुक्रमेह अशा विकारांमध्ये ही अत्यंत उपयुक्त आहे. कोकिलाक्ष सेवनाने "हॉर्मोनल व न्युरो-हॉर्मोनल" यंत्रणेत बदल घडून हे परिणाम दृष्ट स्वरुपात साकार होतात. रक्तातील टेस्टोस्टेरॉन, कोलेस्टेरॉल व प्रथिनांमध्ये समतोल राखून ही वृष्य, वाजीकर व धातुपोषक कार्य करते.
     अक्कलकारा (Anacyclus pyrethrum) : वीर्यवर्धन, शुक्राणु संख्यावर्धन, बलवर्धन व प्रजनन शक्ती सुधार अशा अनेक बीजस्वास्थ्योपयोगी गुणांनी समृद्ध अशी ही वनस्पती आहे. हिच्या सेवनाने वृषण ग्रंथींचा आकार व वजन वाढते, पौरुषग्रंथीचा आकार वाढतो, शुक्रवाहिनीचा व्यास वाढतो, वृषणाला रक्त पुरवठा सुधारतो, शिस्नाचा ताठरपणा तीन पटीने वाढतो. अर्थातच प्रजननाच्या दृष्टीने सर्व अनुकूल गुण ह्या वनस्पतीत ठासून भरले आहेत.
      नागवल्ली पत्र (Piper betle) : नागवल्ली पत्र म्हणजे सर्वांना सुपरिचित असलेले विड्याचे पान. मानसिक ताण-तणाव हे वंध्यत्वाचे एक प्रमुख कारण आहे आणि यावर इमिप्रामाईन नामक औषध आधुनिक वैद्यकात दिले जाते. नागवल्ली व इमिप्रामाईन यांच्या तौलनिक अभ्यासातुन नागवल्लीचा मानसिक ताण-तणाव निर्मूलनाचा गुण इमिप्रामाईन पेक्षा अधिक श्रेष्ठ आहे हे सिद्ध झाले. ह्यातील सुगंधी द्रव्याचा परिणाम मज्जा यंत्रणेवर होऊन एपिनेफ़्रिन व नॉरएपिनेफ़्रिन चे स्राव उत्तेजित होतात ज्यामुळे मज्जा यंत्रणेला प्रोत्साहन मिळते. शिवाय "चेविकॉल" हे तिखट द्रव्य उत्तम पाचक व उत्तेजकाचेही कार्य करते. नागवेलीपत्रातील रसायन विद्युत-चुंबकीय लहरींमुळे होणाऱ्या शुक्रदोष निवारणात समर्थ आहे.
पाठातील प्रत्येक घटकाची माहिती घेतल्यावर असे स्पष्ट हो�
लेखक –
वैद्य संतोष जळूकर
संचालक,
अक्षय फार्मा रेमेडीज,
 मुंबई
+917208777773
drjalukar@akshaypharma.com

No comments:

Post a Comment

Visit Our Page