Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Thursday, November 26, 2015

आहारयोग


आहारयोग

लेख क्रमांक 3

आज आहाराच्या अतियोगाविषयी जाणून घेऊया.
अतियोग म्हणजे गरजेपेक्षा जास्त खाणे, जास्त वेळा सेवन करणे, भूक न लागताही खाणे, वेळेवर वा अवेळी पण पचायला अति जड, अति स्निग्ध, थंड, एकाच प्रकारचे वा रसाचे अन्न उदा फक्त गोडच वा तिखटच अन्न खाणे, जेवताना 2 घास कमी खावे असे असूनही केवळ जिभेला चांगले लागतेय म्हणून खाण्या-पिण्याचा अतिरेक करणे, तडस लागेपर्यंत जेवणे, जेवल्यावर सुस्ती, जडपणा जाणवणे म्हणजे अतियोग.
वजन जास्त असणारे वा मेद/चरबी जास्त असणार्या व्यक्तिंमध्ये अन्न प्रमाणतः जास्त असतेच असे नाही, मात्र पचायला जड, अयोग्य, अतितेलकट-तुपकट अन्नपदार्थ वेळी-अवेळी खाण्याने शरीर अतिबाळसेदार, फोपसे होते.
काही व्यक्ति सांगतात - की अगदी हवा ही सुद्धा अंगी लागते smile emoticon.. विनोद बाजूला ठेवला तर हवा ही अंगी लागते यासाठी पूर्वीचा चुकीचा आहार-विहार कारणीभूत आहे आणि त्याचे परिणाम आजही दिसताहेत असेच म्हणायला हवे.
आधीच्या लेखात वजन कमी करण्याचे अशास्त्रीय व चुकीचे पर्याय वापरले जातात असे लिहिलेय. त्याचप्रमाणे वजन वाढविण्यासाठीही फक्त केळी, वेगवेगळे flavoured शेक्स्, High protein, Soy, Malt इ.युक्त supplements, यांचा अयोग्य, अधिक व अनिर्बंध वापर याचेही दुष्परिणाम कालांतराने दिसतातच. केवळ खाणेच नव्हे तर Steroids सारख्या औषधांनीही वजन वाढणे, सूज येणे असे दुष्परिणाम दिसतात. जाहिरातींच्या मागे न लागता, आपल्या आयुर्वेदीय तज्न्य वा वैद्याला विचारून आपल्या पचनशक्ति व भुकेप्रमाणे खाणे हेच योग्य आहे.
बरे असे अति व अयोग्य खाण्याचे इतर दुष्परिणाम काय तर याने फक्त शरीरातील चरबीच जास्त वाढते, पण इतर सर्व शरीरघटकांचे योग्य पोषण न झाल्याने, दिसायला शरीर मोठे मात्र ताकद नाही असे होते, सूज येते, घाम येतो, कायम जडपणा, सुस्ती, निरुत्साह जाणवतो, केसांचे, त्वचेचे रोग होतातच शिवाय प्रमेह, मेदोरोग, हृदय, वृक्क/किडनीवर परिणाम, अंतःस्रावी ग्रंथीवर दुष्परिणाम, लघवीच्या तक्रारी, घामाच्या तक्रारी इ. अनेक तक्रारी निर्माण होतात. यावर आहार-विहार-जीवनशैली बदलणे हाच उपाय आहे हे कळत असूनही फक्त dieting वा पाणीच भरपूर पिणे, नुसती फळेच खाणे वा वेगवेगळे रस घेणे, वजन कमी करणाऱ्या गोळ्या घेणे, HRT, इन्सुलीन, थायराॅईड, इस्ट्रोजेन अशी hormonal treatment घेणे, केवळ ओटस्, सोया, काॅर्नफ्लेक्स असेच खाणे, कोणताही व्यायाम पण तोही प्रकृती,काल,वय,शरीराची गरज यांकडे दुर्लक्ष करून करणे अशा मार्गांनी कायमचा नव्हे तर तात्पुरता उपाय होतो, अपायही होतो. अशाने आलेले आजारपण लांबते. शिवाय आजारांचे स्वरूपही गंभीर असते.
जसे अन्नाबद्दलचे तसेच कोणतेही पेये अगदी पाणी सुद्धा पिण्याचा अतिरेक होऊन चालत नाही. पाणी न पिता इतरच पेये घेणे मग ती soft drinks असो वा hard drinks, चहा वा काॅफी इ पेये - त्यांच्या अतिरेकानेही त्रास होतात, शरीराचे योग्य पोषण होत नाही, प्रमेह, सूज येणे, यकृत्, किडनीवर ताण येऊन त्याची दुखणी निर्माण होणे असे विकार प्रामुख्याने होतात. विकतच्या पेयांतील कृत्रिम घटकांचे त्रास कैक पटींनी जास्त व दीर्घकालीन आहेत.
बघा बरं - जीभ व पोट हे स्वास्थ्य राखण्यासाठी आहेत, चोचले पुरविण्यासाठी नाहीत हे कळायला काही रोगच व्हावे लागतात, त्याशिवाय किंवा तरीही आपण मूळ कारणांचा विचार करत नाही यापेक्षा मोठे दुर्दैव कोणते? अज्ञानात सुख असते असे म्हणतात. तात्पुरते खरे असेलही ते पण दुर्लक्ष करण्यात मात्र सुख व कायमचे हित नक्की नाही.. हो किनई?
मागील लेखात लिहिल्याप्रमाणे आपल्या मौल्यवान शरीराशी, मनाशी संवाद साधलात का? साधला असेल तर उत्तमच. कालच हा संवाद साधायचा होता खरा, पण आजही, आत्ताही सुरुवात करू शकतोच की आपण.. तर सुरुवात करा, शरीराशी संवाद साधा- स्वतःच्या मनात डोकावून पाहा.. अगदीच नाही काही कळलं तर विचारा की आपल्या वैद्यांना.. अगदी समाधान होईपर्यंत विचारा पण मग मात्र खरोखरीच योग्य खाण्याचा मार्ग स्वीकाराच ही कळकळीची विनंती.

© वैद्य तनुजा गोखले,
पुणे.
tanugokhale@gmail.com
skype ID - tanugokhale
twitter handle - tanugokhale
संपर्क - 9765383735

No comments:

Post a Comment

Visit Our Page