Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Saturday, July 23, 2016

दूर ठेवा संधीवात

दूर ठेवा संधिवात
वयाच्या चाळिशीनंतर हाडांची झीज होणे, त्यामुळे सांधे दुखी सुरू होणे हे स्वाभाविकच म्हटले पाहिजे. मात्र, जीवनशैलीतील   बदल, आहारावरील नियंत्रण , नियमित व्यायाम, आयुर्वेदिक औषधी व पंचकर्म याच्या योगाने संधीवात दूर ठेवता येऊ शकतो.
वृद्धत्व ही निसर्गचक्रातील एक अवस्था आहे. शरीरातील अवयवांची आणि त्यांच्या क्रियांची झीज व्हायला लागते. या झिजेच्या प्रक्रियेत एक प्रमुख अवयव चाळिशीनंतर झिजायला लागतो, तो म्हणजे हाडे. आणि त्यामुळे होते वेगवेगळ्या प्रकारची सांधेदुखी किंवा संधिवात.
संधिवात होण्याची अनेक कारणे आहेत. काहींच्या हाडांत जन्मजात विकृती असते. सूज, दाह, जंतूंचा प्रादुर्भाव झाल्याने अपघातामुळे हाडांना मार लागण्यामुळे किंवा तुटणे सरकण्यामुळे विविध प्रकारच्या कर्करोगांनी हाडांना पोचणाऱ्या इजेमुळे, वयोमानानुसार मणक्‍यांची/ हाडांची होणारी झीज, शिवाय हाडे ठिसूळ होण्यामुळे, या आणि अशा अनेक कारणांमुळे संधिवात होत असतो.
आपल्याला काही सवयी लागलेल्या असतात त्यामुळे अशा दुखण्यांना आपण स्वतःहूनच निमंत्रण देत असतो. उदाहरणार्थ- बसण्याची, उभे राहण्याची पद्धत, जास्त वजन असणाऱ्यांच्यासुद्धा शरीराचा भार गुडघ्यांवर पडल्यामुळे तेथील सांध्यांतील हाडांवर, संधिबंधांवर परिणाम होऊन पायांना बाक येणे, गुडघे दुखणे, सुजणे, हालचाली करताना त्रास होणे, खाली उठता-बसता न येणे, अशा तक्रारी सुरू होतात. वाकण्याची पद्धत, व्यायामाचा अभाव, जास्त वजन उचलणे, नैराश्‍य, मानसिक ताण, व्यावसायिक चिंता या सर्वांमुळेही सांधेदुखी आपल्या नकळत सुरू होऊन वाढत जाते. स्त्रियांमध्ये खाली बसून भांडे धुणे, कपडे धुणे, स्वंयपाक करण्याची पध्दत यामुळे गुडघ्याच्या स्नायुंवर, हाडावर ताण पडतो.
पचनाच्या तक्रारींमुळे किंवा जास्त प्रमाणात अनियमित खाल्ल्याने, मलप्रवृत्तीच्या अनियमितपणामुळे अन्नपचन व्यवस्थित होत नाही. त्यामुळे शरीरात एक प्रकारची विषारांची किंवा आमाची निर्मिती होते. तो “आम’ सांध्यांच्या ठिकाणी साठून वातदोषांच्या साह्याने तेथे विकृती निर्माण करून आमवाताची सुरवात होते. तसेच स्त्रियांच्या रजोनिवृत्तीच्या काळात शरीरात जे काही अंतःस्रावी ग्रंथीच्या स्रावात बदल होतात त्यामुळे वजन वाढते. हाडे झिजायचे प्रमाणही या काळात अधिक असल्याने संधिवात या वयात सुरू होतो.
सध्या मध्यम व उच्च वर्गातील रुग्णांमध्ये वाढती सांधेदुखी घेऊन येणारे रुग्ण अतिप्रमाणात येत आहेत. त्यावरुन त्यांचे निदान आम्ही करत असतांना ते बहुधा संधिवाताच्या, आमवात, वातरक्त इत्यादी गंभीर प्रकारातील आढळतात. लड्डा आयुर्वेदिक मधील पंचकर्म चिकित्सा संधिवातासाठी खूप उपयोगी पडते. यात स्नेहन-स्वेदनपूर्वक बस्तिचिकित्सा, रक्तमोक्षणासारखी चिकित्सा केली जाते.
स्नेहन – यात स्नेहन/मसाज हा विशिष्ट औषधी तेलाने दुखणाऱ्या सांध्याला विशिष्ट पद्धतीने करावा. हा तज्ज्ञ व्यक्तींकडूनच करून घ्यावा. सांध्याच्या रचनेनुसार मसाज करण्याची दिशा ठरते. यासाठी विविध औषधी तेलांचा उपयोग होतो. दुखणाऱ्या सांध्यांबरोबरच सर्वांगाला औषधी तेलाचा मालिश केल्यास फायदा होतो. मसाजामुळे अस्थिधातूतील वाताचे शमन होते. हाडांची झीज होत नाही. अस्थिसंधी, मांस, स्नायू यांचे पोषण होते. पर्यायाने दृढता वाढून तेथील दुखणे कमी होते, सूज कमी होते. हालचालींना सुलभता येते.
स्वेदन – विशिष्ट औषधी द्रव्यांची वाफ विशिष्ट पद्धतीने दुखणाऱ्या सांध्यांना देण्यात येते. उदाहरणार्थ – नाडीस्वेद, पिण्डस्वेद, वालुकापोट्टली स्वेद. जेव्हा एखाद्या हाडाला पोषणाची आवश्‍यकता ?सेल, तेथील रक्तपुरवठा सुरळीत करावयाचा असेल तेव्हा पिण्डस्वेद पत्रपोट्टली स्वेद करता येतो. यासाठी साठेसाठीचा भात, गाईचे दूध, गुळवेल, देवदार- निर्गुंडीसारखी औषधी द्रव्ये वापरली जातात. त्यांचा उपयोग हाडांची झीज कमी होण्यास आणि तेथील घनता वाढवण्यात होतो.
बस्ती – या स्नेहन-स्वेदनानंतर, म्हणजेच मसाज आणि शेकानंतर काही औषधी द्रव्यांच्या काढ्यांचा आणि औषधी तेलांचा बस्ती किंवा एनिमा दिला जातो. बस्तिचिकित्सा ही वातावरची श्रेष्ठ चिकित्सा सांगितली आहे. सांधेदुखीबरोबरच पचनाच्या तक्रारीसाठी वजन कमी करून पर्यायाने गुडघ्यांवरील भार कमी करण्यासाठी या उपचारांचा उपयोग होतो. या सर्व पंचकर्मांच्या क्रिया या तज्ज्ञ वैद्यांकडूनच करून घ्याव्यात. याशिवाय आभ्यंतर औषधोपचारामध्ये गुग्गुळ कल्प उपयोगी पडतात.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात सर्वसामान्य जनतेत कामाच्या व्यापाने व इतर कारणाने अवेळी भोजन, विरुध्द आहार, भूक लागली नसतांना पण जेवणे, तेल तुपाचे पदार्थ, अति स्निग्ध, जड असे भोजन करणे व लगेचच फिरणे, तसेच सदा काही ना काही खात राहणे. नुसते पडुन वा बसून राहणे. थंड कुलरसमोर वा वातानुकुलीन रुममध्ये जास्त काळ राहणे. रोज दिवसा झोपणे, लठ्ठ होण्याच्या इच्छेपोटी अति स्निग्ध पदार्थ जसे तूप, बदाम, काजू, शेंगदाणे, दूध व त्याची विकृती, बासुंदी, दही, श्रीखंड आदी खाणे. आईसक्रीम खाणे, फ्रीजचे अतिथंड पाणी सतत पिणे, रात्री कामास कंटाळून रोज भात, खिचडी खाणे अशा आहार व विहाराने दुषित अशा (विकृत आहार रस भाव) आम या विषारी घटकाची, मेदाची वृध्दी होते. त्यामुळे लठ्ठपणा (मेदवृध्दी), आमवात (सांधेदूखी) आदि आजारांचे पाहुणे शरीरात येतात. तेव्हा अशा सांधेदुखीच्या रुग्णांना त्यांचे पथ्य म्हणजे त्यांनी भूक लागल्याशिवाय जेवू नये. आहारात स्निग्ध पदार्थ, तांदळासारखे पदार्थ, दूध व त्यांची विकृती, तसेच जड अन्न इ. खाणे टाळावे. तसेच फ्रीजचे अतिथंड पाणी पिणे, थंड पेय इ. टाळावे. कोष्ण पाणी पिणे, दिवसा शरीरास शक्यतोवर सतत व्यायामात राहील असे शरीर हालचालीत ठेवणे. यातच प्रात: फिरणे, घरची कामे करणे इ. पथ्यांनी वरील रोग्यास बराच फायदा होईल. तसेच सांधेदुखीत सांधे हालचालीत राहिल्याने पुढील उपद्रव होणे टळतील. सांधेदुखीचे पथ्यापथ्य सांगताना सध्याच्या बदलत्या हवामानाचा (काळाचा) विचार पण एक प्रमुख मार्गदर्शक ठरतो. तेव्हा उन्हाळ्यात ऊन न पडणे, पाऊस पडणे तसेच हिवाळ्यात पाऊस पडणे वा पावसाळ्यात उन पडणे या बदलत्या वातावरणाचा शरीरावर तसेच सांधेदुखीवर प्रभाव हा पडतो. पण कालाचा परिणाम टाळणे हे अपरिहार्य आहे. त्यावर तोडगा म्हणजे आयुर्वेदातील व्यापक असा पंचकर्म उपचार, स्वस्थ वृत्त, व ऋतकालीन दिनचर्या इ. होय. तसेच काही रुग्णांत आढळणारे सांधेदुखीचे आगळे वेगळे स्वरुप म्हणजे सांध्यात ठणका असणे, दिवसा व रात्री झोप न लागणे, छोटे सांधे दुखणे, अतिशय वेदना, स्पर्शसहत्व, सार्वदेहीक दाह, दौर्बल्य , पांडुता असणे, भूक न लागणे इत्यादी लक्षणे, जी श्रीमंत व सामान्य वर्गात पण आढळतात, त्यांची कारणमिमांसा लावली असता ती म्हणजे दूषित रक्ताची (वात रक्तांची) सांधेदुखी लक्षणे होत.  अश्या रुग्णात मंदाग्नी असताना जेवणे, अजीर्ण झाले तरी खाणे तसेच आंबलेली खारट, आंबट, गोड असे पदार्थ खाणे, त्यातच चाट भांडारवरील पदार्थ अधिक सातत्याने खाणे, दही सतत खाणे, थंड पेये, फळांचा रस थंड असा पिणे, मांसाहार इ. खाणे, अति चहा पिणे, अति मद्यपान करणे, धुम्रपान करणे, रात्री जागरण करणे, अति फिरणे, तसेच आहार व विहार वात व रक्त अशा दोन्ही गोष्टीस प्रकुपित व दुषित करतो. असे दुष्ट व वात संधिस्थानात, शोथ, ठणका आदी पूर्वरुपात्मक लक्षणे उत्पन्न करतात. अशा रोग्यात त्यांनी आपला आहार विहार बदलला पाहिजे. व प्रामुख्याने वरील सातत्याने घडणा­या गोष्टी टाळल्या पाहिजेत. त्यामुळे त्यांच्या सांधेदुखीचे निराकरण व उपचार हा पथ्याने साधता येईल. अशा प्रकारे सांधेदुखीच्या आजारावर व इतर अनेक आजारांवर आपल्याच आहार विहारातून प्रारंभी पथ्यापथ्याने व आयुर्वेदातील इतर व्यापक उपचाराने विजय मिळविणे सहज शक्य होईल.
डॉ. पवन लड्डा
लड्डा आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सालय
पद्मा नगर, बार्शी रोड लातूर.
मो. ०९३२६५११६८१

No comments:

Post a Comment

Visit Our Page