Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Monday, August 29, 2016

गुडघे दुखी

सदाशिव पेठेत राहणाऱ्या या मध्यमवयीन बाई गुडघेदुखीसाठी पहिल्यांदा क्लिनिकमध्ये आल्या त्याला बरोब्बर चार वर्षं झाली.
पाचएक वर्षांपूर्वी त्यांच्या दोन्ही गुडघ्यांमध्ये वेदना सुरू झाल्या.
उठता-बसताना, मांडी घातल्यानंतर, उकीडवे बसून उठताना, जिने चढता-उतरताना तीव्र वेदना होत.
सोबतच दोन्ही बाजूंना कमरेतून कळा येत. सायटिकेचा त्रास होऊ लागला.
पुण्यातल्या नामांकित हॉस्पिटलमधल्या सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञांना दाखविले.
त्यांनी सांगितल्यानुसार काही तपासण्या केल्या. गुडघ्यांच्या एक्स्-रे मध्ये 'ऑस्टिओआर्थ्रायटीस' असल्याचे समजले. गुडघ्याच्या सांध्यांमधली हाडे एकमेकांवर घासत होती. सांध्यातल्या हाडांच्या मधली कूर्चा-कार्टिलेज झिजलेली, हाडांमधे असलेले नैसर्गिक अंतर कमी झालेले. एकूण सगळ्याच हाडांची एकमेकांशी असलेली अलाईनमेंट बिघडलेली.
डॉक्टरांनी सांगितले, "कार्टिलेज झिजलेले आहे, हाडे झिजलेली आहेत. असा संधिवात औषधांनी बरा होत नाही. औषधे देऊन पाहू, पण फरक पडला नाही तर गुडघ्यांच्या सांधे बदलाचे 'नी रिप्लेसमेंट' ऑपरेशन करावे लागेल."
नंतरचे काही दिवस वेदनाशामक औषधे, कॅल्शिअम, व्हिटॅमिन्स्, गुडघ्यांचे व्यायाम, वजन घटविण्यासाठी प्रयत्न, सांध्यावर लावण्याची मलमे असे उपचार झाले.औषधे सुरु असेपर्यंत तात्पुरती वेदना कमी होई. पण पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. त्यात औषधांमुळे सतत पित्ताचा त्रास सुरू झाला. 
शेवटी सांधेबदलाचे ऑपरेशन करण्याचे ठरले.
हल्ली पुण्यात या प्रकारची ऑपरेशन्स मोठ्या प्रमाणात होतात. ऑपरेशन करायचा निर्णय होऊनदेखील ऑपरेशनची तारीख मात्र तीन आठवड्यांनंतरची मिळाली.

दरम्यानच्या काळात बाईंनी वर्तमानपत्रात माझा लेख वाचला आणि 'बघुया तर खरं' अश्या विचाराने तपासायला आल्या.
सगळा इतिहास आणि तपासणी करून सिंहनाद, प्रतापलंकेश्वर, रास्नासप्तक, लाक्षादी, गंधर्व, आंघोळीपूर्वी लावण्यासाठी महाविषगर्भ तेल अशी औषधे सुरु केली. सोबत पथ्ये आणि हालचालींचे नियम सांगितले.
१५ दिवसांनंतर वेदना जरा कमी झाल्या. सायटिकेचा त्रास तर जवळजवळ पूर्णपणे कमी झाला.
बाईंना जरा हुशारी आली. आत्मविश्वास वाटू लागला. आणखी काही दिवस आयुर्वेदाचीच औषधे चालू ठेवायची, ऑपरेशनचे नंतर बघू असे त्यांनी ठरविले.

या घटनेला बरोबर चार वर्षे झाली.
या काळात बाईंनी अतिशय नियमितपणे औषधे घेतली..
पहिल्या पंधरा दिवसांत कमी झालेली सायटिकेची वेदना पुन्हा एकदाही उद्भवली नाही.
गेल्या चार वर्षांत दोन वेळा अमेरिकेला मुलीकडे, एकदा युरोपला सहलीला आणि अनेकदा भारतातल्या काही ठिकाणी सहलीला जाऊनही एकदाही वेदनाशामक औषधे घ्यावी लागली नाहीत. रोज दोनेक किलोमीटर चालतात, पुण्यात गाडी चालवतात.
परवा सहज उत्सुकता म्हणून त्यांनी दोन्ही गुडघ्यांचे एक्स्-रे करून घेतले. रिपोर्ट घेऊन त्यांच्या डॉक्टरना भेटायला गेल्या. एक्स्-रे पाहून डॉक्टर म्हणाले, "औषधे देतो. ऑपरेशनची काही गरज नाही." त्यावर बाई म्हणाल्या,"तुम्ही चार वर्षांपूर्वी ऑपरेशन सांगितले होतेत. दरम्यानच्या काळात मी आयुर्वेदाची औषधे घेतली. माझ्या वेदना फार कमी झाल्या आहेत. आता मला बरे वाटते आहे." डॉक्टरना हे फारसे आवडले नसावे. ते म्हणाले,"आयुर्वेदाच्या औषधांनी हे आजार बरे व्हायला लागले, तर त्या माणसाला 'नोबेल' पुरस्कारच द्यावा लागेल्!"

बाई काल क्लिनीकमध्ये आल्या तेव्हा मला त्यांनी हा किस्सा सांगितला.
वास्तविक, संधिगत वात, सायटिका आणि अश्या अनेक वातविकारांवर उत्तम आयुर्वेद उपचार उपलब्ध आहेत, हे सर्वांना माहित आहेच.
काही दिवसांपूर्वीच टाईम्स् ऑफ इंडियाच्या मुलाखतीत प्रतिनिधीशी बोलताना मी म्हटलं होतं, आयुर्वेद आणि ऍलोपॅथी एकत्र आले, तर भारत वैद्यकीय महासत्ता बनू शकेल!"
बाईंचा आजार कमी झाला होता, हे तर खरेच होते!
राहिला प्रश्न 'नोबेल' पुरस्काराचा... वेदना कमी झाल्याने वाढलेल्या आत्मविश्वासानं बाईंच्या जगण्यात ऑपरेशन न करता अमूलाग्र बदल झाला होता.
आयुर्वेदाबद्दलची त्यांची आणि माझीही श्रद्धा कितीतरी वाढली होती.

..अश्या शेकडो रुग्णाच्या समाधानी डोळ्यात माझा 'नोबेल्' पुरस्कार मला केव्हाच मिळाला होता.

Dr. Atul Rakshe
9422034506
पुणे

No comments:

Post a Comment

Visit Our Page